फलटणकरांनो, घाबरू नका…पण सर्वतोपरी काळजी घ्या : शिवाजीराव जगताप


 

स्थैर्य, फलटण, दि. ३ : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर व तालुक्यातील लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, सर्वतोपरी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी शिवाजीराव यांनी केले आहे.

जगताप म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत, व जे त्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी घाबरून न जाता आपल्या राहत्या ठिकाणी विलगीकरणात जावे. असे रुग्ण व संपर्कातील सर्वांना प्रशासनामार्फत संपर्क साधला जाईल व पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. कोणीही घाबरून जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी. ज्यांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांनी रुग्णालयात ॲडमिट होण्यासाठी घाई करू नये. सर्वांना संपर्क साधला जाईल व योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. याबाबत सर्वांनीच प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. 

दरम्यान, अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत, त्यांनी मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. कामावर जाणाऱ्या युवक कर्मचाऱ्यांनी कामावरून घरी आल्यानंतर घरातील ज्येष्ठ नागरिक, आई-वडील, आजी-आजोबा यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहावे. त्यांच्याशी बोलताना घरातही मास्क वापरावे. ज्यामुळे त्यांना होणारा कोरोना प्रादुर्भाव टाळता येईल. अनेकदा मित्रांसोबत गप्पा मारतानाही मास्क काढून ठेवले जातात, मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणीच नाही, तर कार्यालयातही केला पाहिजे, अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येतानाही मास्कचा वापर जरुर केला पाहिजे, असे शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!