
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित चर्चासत्रात प्रवीण दरेकर यांनी सहकारी संस्थांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचे आवाहन केले. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
स्थैर्य, सातारा, दि. २० एप्रिल : ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विविध सहकारी संस्थांवर अवलंबून आहे. ज्या संस्था सध्या अडचणीत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, केवळ शासनावर अवलंबून न राहता सहकारी संस्थांनी स्वतःच्या उत्पन्नाचे विविध नवनवीन स्रोत निर्माण केले पाहिजेत, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.
साताऱ्यात सहकार चळवळीवर विशेष चर्चासत्र
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘सहकार चळवळीसमोरील आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. दरेकर बोलत होते.
या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक धनंजय शेडगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे’
प्रवीण दरेकर म्हणाले, “सहकारी संस्थांना शासन मदत आणि अनुदान देत आहे, परंतु त्यासोबतच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे अधिक गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा लाभली असून, येथील जिल्हा बँक शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करून मोठी ताकद देत आहे. सभासदांनीही सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करून संस्थांचे बळकटीकरण करावे.”
शासन संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : मंत्री शिवेंद्रराजे
यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्था अनेक अडचणींवर मात करून उत्कृष्ट कार्य करत आहेत. या संस्थांना जिल्हा बँकेचे नेहमीच मोठे सहकार्य लाभते. संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
‘जिल्हा बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी’ : खा. नितीन पाटील
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, “जिल्हा बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून देशात एक अग्रणी बँक म्हणून ती ओळखली जाते. सहकार क्षेत्रात शिस्त आणि प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा चर्चासत्रांमुळे संस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास निश्चितच मदत होईल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शेडगे (शेळके) यांनी केले. या चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
