ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी आक्रमक; ५०० रुपये न दिल्यास कारखाने रोखण्याचा इशारा

फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ११ सप्टेंबर : गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप झालेल्या उसासाठी प्रतिटन ५०० रुपयांचा दुसरा हप्ता कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यातील चार साखर कारखान्यांना निवेदने देण्यात आली.

चार साखर कारखान्यांना निवेदने

श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, स्वराज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड उपळवे, शरयू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कापशी आणि श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी या कारखान्यांना संघटनेने निवेदने दिली. शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रतिटन ३२०० रुपये मिळाले असून, गेल्या वर्षी कारखान्यांनी अतिरिक्त २०० रुपये देण्याचे मान्य केले होते, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

साखरेच्या वाढलेल्या दराचा विचार करून या २०० रुपयांसह आणखी ३०० रुपये वाढ देत एकूण ५०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. हा हप्ता आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हप्ता न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

“राजू शेट्टी यांच्या आदेशाने आम्ही हे आंदोलन उभे केले आहे. शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजेत. कारखाना सुरू होण्यापूर्वी ५०० रुपये जमा झाले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही,” असा इशारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला.

मागणी मान्य न झाल्यास ऊस वाहतूक आणि साखर उचल बंद करण्यासह कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले जाईल, असेही महामुलकर यांनी सांगितले. आंदोलनातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार आणि प्रशासनाची राहील, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, रवींद्र घाडगे, किरण भोसले, विक्रम पवार, बाळासाहेब शिपुकले आणि अजित लाळगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विविध कारखान्यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांनी ही निवेदने स्वीकारली.

Back to top button
Don`t copy text!