सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी बँकांनी कार्यरत रहावे – खासदार श्रीनिवास पाटील


स्थैर्य , सातारा , दि .२८:  सर्व बँकांनी सामाजिक जबाबदारी समजून सर्व सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी कार्यरत रहावे. तसेच पिक कर्जाचे वाटप 100 टक्के करावे, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्या.

जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज नियोजन भवनात झाली. यावेळी खासदार श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र बँकेचे उपअंचल प्रबंधक श्रीकृष्ण झेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे, यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते.

चालु वर्षासाठी 7 हजार 500 कोटीचा पतपुरवठा प्राथमिक क्षेत्रासाठी अग्रणी बँकेने तयार केला आहे. त्यापैकी राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खासगी बँकांद्वारे 5 हजार 571 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. सर्व बँकांनी आपले उद्दिष्ट 100 टकके पूर्ण करा, असेही खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

खरीपासाठी 1 हजार 682 कोटी कर्ज वाटप केले असून उद्दिष्टाच्या 105 टक्के काम बँकांनी साध्य केले आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी राष्ट्रीय ग्रामीण जिवन उन्नती योजनेची माहिती देवून सर्व बँकांनी योजनेंतर्गत यावर्षी बचत गटांना उद्दिष्टानुसार वित्त पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!