

भर उन्हाळ्यात विडणीत रात्रीच्या वेळी होणाऱ्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ हैराण होते. सचिन अभंग व सागर अभंग यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.
स्थैर्य, विडणी, दि. २२ मे : विडणी गावातील विविध वाड्या-वस्त्यांवर रात्रीच्या वेळी होणाऱ्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पंचायत समिती सदस्य सचिन अभंग आणि सरपंच सागर अभंग यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणने याची दखल घेतली असून, लवकरच सिंगल फेज वीजपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
नागरिकांचे हाल
भर उन्हाळ्यात महावितरण कंपनीकडून विडणीत मागील काही दिवसांपासून रात्री सहा ते दहा या वेळेत वीजकपात केली जात होती. यामुळे दूध उत्पादक शेतकरी, लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांना मोठा फटका बसत होता.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा
या गंभीर प्रश्नावर पंचायत समिती सदस्य सचिन अभंग यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्याशी सविस्तर विचारविनिमय केला.
वीजपुरवठा होणार सुरळीत
सरपंच सागर अभंग यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी प्रशासनाकडे केली. प्रशासनाने याची दखल घेत त्वरित पावले उचलली आहेत. त्यामुळे लवकरच गावातील विविध वाड्या-वस्त्यांवरील सिंगल फेज लाईटचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.