माणूसकीची भिंत हा उपक्रम माणूसकी जपणारा : मुख्याधिकारी प्रसाद काटकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण दि.२९ : फलटण शहरात माणूसकीच्या भावनेतून काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सुरु केलेला माणूसकीची भिंत हा उपक्रम माणूसकी जपणारा आणि गोर गरिबांना आधार देणारा असून जनतेने या उपक्रमास भरभरुन सहकार्य करावे असे आवाहन फलटण नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.फलटण शहरातील म. फुले चौकामध्ये माणूसकीची भिंत या नको असेल ते द्या, पाहिजे असेल ते घेऊन जा या उपक्रमाचे उदघाटन प्रसंगी मुख्याधिकारी प्रसाद काटकर बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद बांधकाम फलटण उपविभाग सहाय्यक अभियंता सुनील गरुड, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, मराठा क्रांती मोर्चाचे माऊली सावंत यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.

फलटण तालुक्यात सामाजिक भान ठेवून समाजकार्य करणारी मंडळी एकत्र येऊन कोरोनाच्या संकट काळात विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे, सध्या थंडी सुरु झाली असून गोरगरिबांना माणूसकीची भिंत या उपक्रमाच्या माध्यमातून उबदार कपडे, अंथरुण, पांघरुण मोफत मिळणार आहेत, ज्यांच्याकडे देण्याची दानत आहे त्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी यावेळी केले.

माणूसकीची भिंत या उपक्रमाची देखभाल करणारे अमित मठपती यांचा सत्कार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमास पहिल्याच दिवशी शहर वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यांच्याकडे नको असणारे जे जे होते मग त्यामध्ये कपडे, साड्या, बॅगा, पर्स, शाळेच्या विद्यार्थ्यांची जुनी सुस्थितीतील दप्तरे, जुन्या चप्पल्स, बूट, महिलांच्या पर्स, उबदार कपडे, चादरी वगैरे अनेकांनी येथे आणून देऊन सढळ हाताने मदत केली, त्याचप्रमाणे ज्यांना गरज होती त्यांनी ते घेऊन जाताना संकोच केला नाही इतकी आपुलकी संयोजकांनी जपल्याचे दिसून आले.

माणूसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम म. फुले चौक, फलटण येथे गोरगरीब जनतेसाठी सुरु करण्यात आला असून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत हा उपक्रम दि. 6 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. ज्यांना कपडे, उबदार पांघरुण, जीवनावश्यक वस्तू यांची गरज आहे त्यांनी घेऊन जावे तसेच दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!