बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा; शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका


स्थैर्य, मुंबई , दि .२६: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली. महाराष्ट्रातील फक्त 6 जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘जपानने भारताला बुलेट ट्रेन दिली आहे. त्याबद्दल त्यांच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ‘ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील मी त्यांचे स्वागत करतो. इतके मोठे राज्य आहे लोक इतके काम करतात, पण राज्यातील फक्त 6 लोकांना पुरस्कार लोकांना मिळाला आहे. दरवर्षी 10 ते 12 लोकांना सन्मान देण्यात येतो आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 6 पुरस्कार? असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला. राज्य सरकारकडून काही नावांची शिफारस केली जाते. ज्या सहा जणांना पुरस्कार देण्यात आले आहे, मला वाटते त्यातील एक ही नाव यादीतले नसेल, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान यावेळी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पुरस्कार देण्याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ‘जपानने आपल्याला बुलेट ट्रेन दिली आहे. त्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला असावा, ती बुलेट ट्रेन महाराष्ट्रने नाकारली असल्याचे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!