थंडी वा-यासह साता-यात पाऊस; चहाच्या टप-यांवर गर्दी


 


स्थैर्य, सातारा, दि.१४ : सातारा शहर आणि परिसरात आज (सोमवार) सकाळपासून
ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील किल्ले अजिंक्‍यतारा परिसरात
सकाळपासून पावसाच्या हलकी सरी पडत आहेत. किल्ले अजिंक्‍यतारा, यवतेश्‍वर या
भागात सकाळी फिरायाला जाणा-यांची संख्या आज कमी होती. बहुतांश ठिकाणी
स्वेटरवर रेनकोट घालून नागरीक आपआपल्या कामाला जाताना दिसत होते. 

गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण
निर्माण झाले होते. महाबळेश्‍वर येथे देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली.
कडाक्‍याच्या थंडीत अचानक पाऊस आल्याने पर्यटकांची धावपळ उडाली. अनेकांनी
गरम कपडे घेण्याबरोबर छत्री खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली. सलग
सुट्यांमुळे महाबळेश्‍वर पाचगणी पर्यटकांनी गजबजले आहे. आज (सोमवार) सकाळी
येथे पावसाची रिमझिम होती.

पर्यटक थंडी आणि पावसासह गरम गरम कणीस खाण्याचा आनंद
लुटताना दिसत होते. याबरोबरच वेगवेगळ्या पाईंटसवर फ्रॅकी, पॅटीस
खाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पावसामुळे स्ट्राॅबेरी विक्रेत्यांची
धावपळ उडाली. काहींनी प्लॅस्टिक टाकून माल झाकून ठेवला. 

दरम्यान अवकाळी पावसाचा फटका पीकांना विशेषतः कांदा
राेपांना बसू नये यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. बदलत्या
हवामानामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!