फलटण – बारामती रेल्वे मार्गासाठी नाहक वेळ वाया जाणार असेल तर जमिनींचे सक्तीने भूसंपादन करा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर


स्थैर्य, फलटण, दि. २७ : फलटण – बारामती रेल्वे मार्गासाठी खाजगी वाटाघाटीने मार्ग निघण्यात अडचणी येत असतील त्या मुळे जमीन अधिग्रहणासाठी नाहक वेळ वाया जाणार असेल तर सदर जमिनी सक्तीने भूसंपादन करुन ताब्यात घ्यावे. रेल्वे मार्गाचे प्रलंबीत काम त्वरित सुरु करण्याच्या आदेश माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा सोलापूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

फलटण – बारामती व फलटण – लोणंद रेल्वे मार्गाचे प्रलंबीत अडचणी बाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फलटण येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी रेल्वे पुणे विभाग व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा, सहाय्यक व्यवस्थापक जे. सी. गुप्ता, सहाय्यक व्यवस्थापक योगेंद्रसिंह बैस, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, कोरेगावच्या प्रांताधिकारी श्रीमती ज्योती पाटील, फलटणचे तहसीलदार समीर यादव, रेल्वेचे अधिकारी जी. श्रीनिवास, राजेंद्र कुलकर्णी, सतीश कोंडलकर, मुख्य नियंत्रक एम. के. सिंबीयन, मनोरंजन कुमार, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, सुनील यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फलटण – बारामती रेल्वे मार्ग ३७ कि. मी. लांबीचा आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यातील १३ व फलटण तालुक्यातील ३ गावातील जमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी बारामती तालुक्याला ११५ कोटी व फलटण तालुक्याला १५ कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याचे यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी स्पष्ट केले.

फलटण – लोणंद रेल्वे मार्गाचे भूसंपादन करताना काही शेतकऱ्यांचे केवळ १ ते ३ गुंठे क्षेत्र शिल्लक रहात आहे. वहिवाटणे संबंधीत शेतकऱ्यांना फायदेशीर नसल्याने रेल्वेने सदर शिल्लक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्राचे भूसंपादन करावे अशी सदर शेतकऱ्यांची मागणी आहे तरी सदरील मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

फलटण-पुणे मार्गावर रेल्वे वाहतुकीस मान्यता मिळाली असल्याने लवकरच या मार्गावर प्रवासी व माल वाहतूक सुरु होणे अपेक्षीत असल्याने या मार्गावरील किरकोळ दुरुस्ती, रेल्वे गेट, बायपास वगैरे प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेऊन संपूर्ण मार्ग वाहतुक योग्य होईल यासाठी नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना देतानाच प्रामुख्याने या मार्गावरील सर्व गेट स्वयंचलीत करावीत, अंडर पासेस ठिकाणी रस्ते सुस्थितीत राहतील, रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साठल्याने वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच फलटण रेल्वे स्टेशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, दुरुस्ती असेल तर ती तातडीने करावी आणि स्टेशन इमारतीची मोडतोड, नासधूस टाळण्यासाठी तेथे सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशा सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

आदर्की रेल्वे स्टेशन गावापासून किंबहुना लोकवस्तीपासून दूर असून तेथे कोणतेही वाहन अगदी दुचाकी ही जाऊ शकत नसल्याने या स्टेशनवर उतरुन घराकडे जाणाऱ्या किंवा स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना ७/८ कि. मी. चालत जावे व यावे लागते. सदर स्टेशन आदर्की गावाजवळ स्थलांतरीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तरी याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्यानंतर स्टेशन स्थलांतरीत करणे शक्य नाही, त्यापेक्षा तेथे जाण्यासाठी रस्ता करणे सोईस्कर होईल, त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

वाठार स्टेशन येथे शेतमाल रेल्वे वाहतुकीची व्यवस्था, रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणामुळे पिंपोडे येथील रेल्वे गेट बंद झाल्याने तेथे पर्यायी मार्ग काढणे साठी सूचना देऊन त्यासाठी आवश्यक निधी रेल्वे बोर्डाकडून मंजूर करुन आणण्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

या बैठकीनंतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत फलटण व सुरवडी रेल्वे स्टेशन, रेल्वे गेट, बायपास वगैरेंची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व सूचनांनुसार आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.


Back to top button
Don`t copy text!