
दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यात गेल्या दोन तारखेपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा मंत्री शंभूराजे देसाई यांनी घेऊन नुकसान पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार महेश शिंदे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
शंभूराजे देसाई म्हणाले, गेल्या दोन तारखेपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरांची काही ठिकाणी पूर्णतः तर अंशतः पडझड झालेली आहे. याचबरोबर शेतीचेही नुकसान झाले आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान झालेली आहे. जोरदार पावसाच्या लोंढ्यांमुळे काही ठिकाणी जमिनी खरवडून जाण्याचे प्रकार घडले आहेत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये गाळ साचून व लोंढे वाहून आल्यामुळे भरून गेलेले आहेत.
याबाबत नुकताच जो जीआर शासनाने काढलेला आहे त्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या या बाबी आहेत. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांना देण्यात आल्या आहेत.
पावसामुळे शासकीय मालमतेचेही नुकसान झाले आहे. छोट्या ओढ्यांवर पाईप टाकून केलेले साकव तसेच नळ पाणी योजनांच्या पाईप वाहून गेलेल्या आहेत. याबाबत वेगळा प्रस्ताव करण्याच्या व नुकसानीचा अहवाल देण्याच्या सूचना कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
12 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आहेत. तत्पूर्वीच अहवाल देण्यात बाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती, मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 तारखेला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहवाल देण्याची गडबड न करता 14 तारखेपर्यंत एकदमच अहवाल द्यावा, अशी सूचना प्रशासनाला केल्याचे देसाई यांनी सांगितले.
नुकसानभरपाई बाबत 65 मिलिमीटरचा निकष असला तरी काही ठिकाणी नुकसान प्रचंड असते मात्र पाऊस 60 ते 62 मिली पडलेला असतो. असे नुकसान विशेष बाब म्हणून भाग ब करून निकषात समाविष्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.