कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येणे गरजेचे : खासदार धैर्यशील मोहिते – पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 08 मे 2025। फलटण । फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी दुष्काळ मिटण्यासाठी कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्णत्वास जाणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामध्ये लक्ष घातले असून जे पुराचे पाणी वाया जात आहे, ते पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा पूर्णत्वास जाईल, असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी व्यक्त केले आहे.

फलटण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार धैर्यशील मोहिते – पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास नाळे यांच्यासह विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार मोहिते – पाटील म्हणाले की, फलटण ते पंढरपूर या रेल्वे प्रकल्पासाठी तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी शेवटच्या रेल्वे अर्थसंकल्पामधून तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सदरील रेल्वे मार्गासाठी निधी मंजूर करून घेतलेला होता. त्यामुळेच आत्ता सदरील रेल्वे प्रकल्पाला चालना मिळाली असून याबाबत नियमित पाठपुरावा आमच्या वतीने रेल्वे बोर्डाकडे व राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे सुरू असून लवकरात लवकर प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

फलटण तालुक्यातील गोखळी येथे डॉ. शिवाजीराव गावडे यांनी त्यांच्या पाणी प्रश्नाची माहिती मला दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार योग्य त्या शासनाच्या विभागाकडे नक्कीच पाठपुरावा आमच्या वतीने करण्यात येईल. यासोबतच दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी व बागायती भागाचे पाणी न जाण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील, याबाबत आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळामध्ये यासाठी कार्यरत राहणार आहोत, असे मत सुद्धा खासदार मोहिते – पाटील यांनी व्यक्त केले.

फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी आज फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, राज्य सरकार व रेल्वे प्रश्नाच्या संदर्भात अनेक निवेदने प्राप्त झाली असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा यावेळी खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी दिले.

येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्याकडून फलटण शहरासह फलटण तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही कटिबद्ध असल्याचे मत यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!