टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड बिजेंद्र गुप्ता अटकेत

२५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट

दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२६ | पुणे |
महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणातील कथित मास्टरमाईंड बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक करण्यात आली असून भिवंडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले असून या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला पुणे विमानतळावर आणले असून, तेथून त्याला पुढील चौकशीसाठी भिवंडी येथे नेण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासात यापूर्वीच तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची दिशा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

अटक करण्यात आलेला बिजेंद्र गुप्ता हा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असून, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून त्याचे नाव समोर आले आहे. तपासात तो मोठे पेपरफुटी सिंडिकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संपूर्ण नेटवर्क आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींची भूमिकाही तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत.

या प्रकरणाचा तपास करताना ठाणे पोलिसांनी देशातील विविध राज्यांमध्ये छापेमारी केली होती. बिजेंद्र गुप्ताच्या शोधासाठी बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये पोलिसांची पथके कार्यरत होती. बिहारमधील पटणा आणि समस्तीपूर परिसरातही पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. दीर्घकाळ भूमिगत राहिल्यानंतर अखेर त्याला बिहारमधून अटक करण्यात आली.

तीन आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात यापूर्वी राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज कुमार या तिघांना अटक करण्यात आली होती. २७ जून रोजी भिवंडी पोलिसांना टीईटी पेपरफुटीबाबत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून या तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. हे तिघे दिल्लीहून ठाण्यात आले होते. त्यांच्या ताब्यातून टीईटी परीक्षेतील प्रश्नांचा संचही जप्त करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी बिजेंद्र गुप्तासाठी काम करत होते.

२५ वर्षांपासून पेपरफुटीशी संबंध असल्याचा दावा
तपासातील सूत्रांच्या माहितीनुसार, बिजेंद्र गुप्ता गेल्या सुमारे २५ वर्षांपासून पेपरफुटीच्या कारवायांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. विविध भरती परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये यापूर्वीही त्याचे नाव समोर आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच वेगवेगळ्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमध्ये तो सक्रिय असल्याचेही पोलिस तपासातून समोर आले आहे.

स्टिंग ऑपरेशननंतर पुन्हा चर्चेत
२०२४ मधील नीट पेपरफुटी वादानंतर एका स्टिंग ऑपरेशनमध्येही बिजेंद्र गुप्ताचे नाव समोर आले होते. त्यामध्ये विविध पेपरफुटी प्रकरणांमध्ये स्वतःचा सहभाग असल्याचेही त्याने कथितपणे मान्य केले होते. तसेच “पेपर लीक कधीच थांबणार नाही” आणि “जेल होईल, जामीन मिळेल आणि हा खेळ सुरूच राहील” अशा स्वरूपाची विधानेही त्याने केल्याचा दावा करण्यात आला होता. आता महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात त्याचे नाव पुन्हा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी त्याला अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.

Back to top button
Don`t copy text!