
कोळकीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतीने चार ऐवजी सहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
स्थैर्य, कोळकी, दि. २५ जून : फलटण शहराचे उपनगर समजल्या जाणाऱ्या कोळकीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने यापूर्वी चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आता थेट सहा दिवसांनी करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
सध्या कोळकी परिसरात पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. पाण्याची उपलब्धतेची स्थिती पाहून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलले आहे. चार दिवसांनी येणारे पाणी आता थेट सहा दिवसांनी येणार असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
कोळकी गावाच्या हद्दीत जाधववाडी ग्रामपंचायतीसाठी मोठ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या गावात हे काम सुरू आहे, त्याच कोळकी गावासाठी पाण्याची साठवणूक करण्याची कोणतीही पुरेशी सोय उपलब्ध नाही. जलसाठवणुकीच्या योग्य नियोजनाअभावी कोळकीतील नागरिकांना या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
