कंगना VS महाराष्ट्र सरकार:5 दिवसांनंतर मुंबईहून मनालीसाठी रवाना झाली कंगना रनोट, म्हणाली – मी जड अंतःकरणाने परतत आहे, मला कमकुवत समजून मोठी चूक करत आहेत लोक


 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: मुंबईत पाच दिवस राहिल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट सोमवारी सकाळी बहीण रंगोलीसह मनालीला रवाना झाली. मनालीला रवाना होण्यापूर्वी कंगनाने दोन ट्विटमधून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी रविवारी मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कंगनाला तिच्या राहत्या घरासंदर्भात नवीन नोटीस पाठवली आहे. ही नोटीस कंगनातील खार येथील घरी करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांसंदर्भातील आहे.

बीएमसीच्या म्हणण्यानुसार, कंगना रनोटच्या घरात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयापेक्षाही घरात अधिक बीएमसीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयानंतर आता घरावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

कंगना मुंबईतील खार (पश्चिम) राहते. ऑरकिड ब्रिजच्या 16 क्रमांच्या एका इमारतीच्या 5 व्या मजल्यावर तिचे 3 फ्लॅट आहेत. एक फ्लॅट 797 चौरस मीटर, दुसरा फ्लॅट 711 चौरस मीटर आणि तिसरा फ्लॅट 459 चौरस मीटरचा आहे. 8 मार्च 2013 रोजी या तिन्ही फ्लॅटची कंगनाच्या नावावर नोंद झाली आहे. कंगनाने हे फ्लॅट घेतल्यानंतर 5 वर्षांनी 13 मार्च 2018 रोजी बीएमसीला या फ्लॅट्समध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आढळले. याबाबतच्या तक्रारीनंतर 26 मार्च 2018 मध्ये बीएमसीकडून कंगनाच्या फ्लॅट्सची पाहणी करण्यात आली. त्याच दिवशी कंगनाला बीएमसीने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस दिली.

बीएमसीने या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कंगनाला उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ते बांधकाम हटवण्याचा इशारा देण्यात आला. 22 मे 2018 रोजी या प्रकरणी सिव्हिल कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आता बीएमसीने न्यायालयाकडे तात्काळ कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. याची सुनावणी 25 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.

कंगना म्हणाली – मी जड अंतःकरणाने मुंबई सोडत आहे

मुंबई सोडण्यापूर्वी कंगनाने ट्विटमध्ये म्हटले की, “मी जड अंतःकरणाने मुंबई सोडत आहे, या दिवसात मला सतत एक प्रकराची दहशत वाटली. माझ्या कामाचे ठिकाण उद्धवस्त केल्यानंतर आता माझे राहते घर तोडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे, सततचे हल्ले आणि शिवीगाळ केली गेली. माझ्याभोवती सावध सुरक्षा होती. पीओकेबद्दलचा माझा मुद्दा बरोबर होता, असे म्हणायला हरकत नाही.’

आज उच्च न्यायालयात उत्तर दाखल केले जाईल

कंगनाचे वकील ऑफिसमधील बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयात आपले उत्तर सादर करतील. आजच त्यांना कार्यालयाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सोपवावी लागतील. त्याचबरोबर कोर्टाने बीएमसीला 18 सप्टेंबरपर्यंत लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. बीएमसीने ही कारवाई बेकायदेशीर मार्गाने केल्याचा आरोप कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला. यासाठी ते बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते आणि तेथे तातडीने सुनावणी झाली होती, त्यानंतर तोडफोडीवर बंदी घालण्यात आली.

बीएमसीने कंगना रनोटला पाठवलेल्या नोटीसमध्ये फ्लॅटमध्ये 8 प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम केल्याचे म्हटले आहे.

इलेक्ट्रिक फिटिंगची जागा सिमेंटने भरण्यात आली आणि त्याचा उपयोग कार्पेट एरिया म्हणून करण्यात आला.

झाडं लावण्यासाठी असलेल्या जागेवर पायऱ्या करण्यात आल्या.

खिडकीवर लावण्यात आलेल्या सज्जाच्या भिंती काढून त्याचा उपयोग बाल्कनी म्हणून करण्यात येत आहे.

सर्विस स्लॅब सिमेंटने भरला आहे आणि त्याच्या शेजारची भिंत तोडून त्याचे रुपांतर बाल्कनी आणि रुममध्ये करण्यात आले.

उत्तर-पश्चिम दिशेने पायऱ्या आणि स्वयंपाकघर यामध्ये कॉमन रस्ता आणि स्वयंपाक घराजवळ दरवाजा बनवण्यात आला.

3 फ्लॅट्समध्ये असलेल्या कॉमन जागेवर लिफ्टच्या समोरच बेकायदेशीर दरवाजे तयार करण्यात आले आहेत.

तिन्ही फ्लॅट्सला जोडण्यासाठी विना परवानगी कॉमन भिंत तोडण्यात आली.

शौचालय आणि बाथरुमजवळील पाईपचा आकार बदलण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!