“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार


स्थैर्य , मुंबई , दि .२५ : दिल्लीच्या वेशीवर साठ दिवसांपासून थंडी किंवा वाऱ्या पावसाची पर्वा ना करता मोठ्या प्रमाणात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी केंद्र सरकारविरोधात आणि सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलनाला बसलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुंबईत दाखल झालेत. या शेतकर्यांच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना केंद्राने पारित केलेले कायदे रद्द करण्यासंदर्भातील निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकरी मार्चला पाठिंबा दिला. मुंबईतील आझाद मैदानावर उपस्थित शेतकऱ्यांना शरद पवारांनी संबोधित देखील केलं. नाशिक, धुळे, नंदुरबारमधून कष्ट घेऊन मुंबईत झालेल्या शेतकऱ्यांचे सुरवातीलाच आभार मानत शरद पवार यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

शेतकऱ्यांबाबत  कवडीचीही आस्था नाही  

गेल्या साठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर प्रचंड अभूतपूर्व आणि शांततामय आंदोलन केलं जातंय. त्या सर्व कष्टकरी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण याठिकाणी उपस्थित राहिलात त्याचं शरद पवार यांनी अभिनंदन केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आक्रमक भूमिका घेतली गेली, म्हणून देश स्वतंत्र झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबई लढली, मुंबईतला कष्टकरी वर्ग रस्त्यावर उतरला म्हणून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यावेळीही मुंबई नगरी आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन आलेले तुम्ही सर्व देशातील शेतकऱ्यांसाठी एकत्रित आलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मात्र ही लढाई अद्यापही संपली नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या देशातील शेतकऱ्यांबाबत आणि कष्टकर्यांबाबत कवडीची आस्था नाही, असा घणाघात शरद पवारांनी केला.

पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? 

गेले ६० दिवस शेतकरी थंडीचा विचार न करता दिल्लीच्या वेशीवर बसून आंदोलन करतोय. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कधी चौकशी केली का?  याउलट सांगितलं गेलं की हा पंजाबचा शेतकरी आहे. पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे ? पंजाबचा शेतकरी साधा शेतकरी नाही, स्वातंत्र्याच्या आंदोलनात जबरदस्त किंमत चुकवणारा शेतकरी म्हणजे पंजाबचा शेतकरी, जालियनवालाबाग सारखा इतिहास घडवणारा, स्वातंत्र्यानंतर चीन असो पाकीअसतां असो, त्यांनी हल्ला केल्यानंतर देशाच्या भूमीचे रक्षण करणारा, असा पंजाब हरियाणाच्या शेतकरी आहे. देशातील १२० कोटीं नागरिकांना अन्न देणारा हा माझा बळीराजा पंजाबचा हरियाणाचा आहे. मात्र त्याबद्दलची नाकर्तेपणाची भूमिका सरकारकडून घेतली जातेय याचा निषेध करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणालेत.

सामान्य माणूस तुम्हाला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही

पुढे शरद पवार म्हणालेत की, 2003 मध्ये कायद्याची चर्चा सुरू झाली. मी कृषिमंत्री असताना बैठक बोलावली आणि या कायद्याची चर्चा सुरू केली. मात्र सरकारकडून संसदेत कायदे आणले आणि आजच्या आज मंजूर झाले असं सांगितलं. या कायद्यावर चर्चा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. या कायद्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी संसदेत सिनेट कमिटी असते, त्यांच्याकडे हा कायदा चर्चेसाठी पाठवा अशी आम्ही मागणी केली. मात्र, चर्चा न करता हे तीनही कायदे पास केले. हा घटनेचा अपमान आहे. पण या देशाचा सामान्य माणूस उठल्यानंतर जबरदस्तीने पारित कायदा आणि तुम्हालाही उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आता झाली आहे.

राज्यपालांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही… 

या कायद्याला आपल्या सर्वांचा विरोध आहे, ही भूमिका आज आपण मांडली. आज मुंबईत जमलेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांना फक्त निवेदन द्यायचं आहे. पण ते गोव्यात गेले आहेत. इथल्या शेतकऱ्यांना भेटायला राज्यपालांना त्यांना वेळ नाही. किमान त्यांनी राजभवनात तरी बसायला हवं होतं म्हणत शरद पवारांनी भाजपवर आणि राज्यपालांवर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.


Back to top button
Don`t copy text!