![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/12/1ambral.jpeg?resize=439%2C247&ssl=1)
स्थैर्य,भिलार, दि ६ : आंब्रळ (ता. महाबळेश्वर) परिसरात रानडुकरांनी धुडगूस घालत काल रात्री स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, ऐन भरात व तोडणीस आलेल्या स्ट्रॉबेरीच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत.
आंब्रळमधील शेतकरी संदीप महादेव आंब्राळे यांच्या शेतात काल रात्री रानडुकरांच्या कळपाने स्ट्रॉबेरीच्या रोपे, तसेच तोडणीला आलेल्या फळाचे आतोनात नुकसान केले. त्यामुळे अगोदर कोरोना आणि लहरी वातावरणामुळे शेतकऱ्यांचा हंगाम चिंतेत असताना या अस्मानी संकटाने शेतकरी नुकसानीत आले आहेत. वन विभागाने या रानडुकरांचा व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अगोदरच अती पावसाने पिके हातची गेली असताना उरलेसुरले पीकही रानडुकरे उखडून टाकत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. रात्रीच्या वेळी डुकरांचे कळप शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी व काढणीच्या बेतात आलेले पीक डोळ्यादेखत उजाड होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आतबट्ट्यात आला असताना आता वन्यप्राणी स्ट्रॉबेरी शेतीवर आक्रमण करीत असल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने या डुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी दिलीप आंब्राळे यांनी केली आहे.