विज्ञानयुगाला सामोरे जाण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा

खासदार शरद पवार; पुण्यतिथीनिमित्त डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 10 मे 2025। सातारा । सर्वांसाठी शिक्षण खुले करणारी रयत शिक्षण संस्था हे एक मोठे कुटुंब आहे. या शैक्षणिक कार्यासाठी विद्यार्थ्यांशी बांधिलकी असणारा रयतचा शिक्षक हाच रयतचा केंद्रबिंदू आहे. संस्थेकडून सातत्याने गुणवत्ता आणि कौशल्य वाढविण्यासाठी प्रत्येक शाखेत विविध उपक्रम राबविले जातात. सध्या काही शाखेत पटसंख्या कमी झालेली असून पटसंख्या आणि गुणवत्ता यावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्मवीर अण्णांनी ज्ञानदानाचे काम करण्याची दूरदृष्टी दिलेली आहे. राज्याचा सर्वांगीण चेहरा मोहरा बदलण्यासाठी रयत कुटुंब हे सर्वोत्तम योगदान देईल. आज गुणवत्ता वाढवणे हे आपल्यासमोरील आव्हान असून आधुनिक विज्ञान युगाला सामोरे जाण्याची ताकद रयतच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करूया, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांनी केले. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना. मकरंद पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, आ.दिलीप वळसे-पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, आ. चेतन तुपे, आ. आशुतोष काळे, आ. बाबासाहेब देशमुख, माजी आ. सुनील भुसारा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, रामशेठ ठाकूर, अरुण कडू-पाटील, मीनाताई जगधने, जयश्रीताई चौगुले, सरोज पाटील (माई), अ‍ॅड. रवींद्र पवार, राम कांडगे, अ‍ॅड. दिलावर मुल्ला. जे. के. बापू जाधव, देणगीदार शकुंतला ठाकूर, कर्मवीर कुटुंबीय, ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा व भविष्यातील ध्येयधोरणांचा आढावा घेतला.

जागतिक मराठी अकादमी यांच्या सहयोगाने शोध मराठी मनाचा हे 20 व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रथम पदवीदान समारंभाचे आयोजन, राजभवनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम, रयतच्या प्रत्येक शाखेत इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविण्याचा निर्णय, रयत मासिकाचे प्रकाशन, इंजिनिअरिंग कॉलेजला सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा स्वतंत्र विभाग, रयतच्या सर्व शाखांमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचा निर्णय, स्कूल कमिटी पुनर्रचना, सक्षम शाखेकडून दुर्बल शाखांना 15 टक्के निधीची मदत, सुधारित किर्द लेखा कार्यपद्धती पुस्तिकेची निर्मिती, रयतच्या सर्व शाखांच्या इमारतीच्या रंगाबाबत एकसमानता इत्यादी निर्णय व उपक्रमांची माहिती देत रयतच्या सर्व अडचणी वर्षभरात दूर करणार असल्याची ग्वाही चंद्रकांत दळवी यांनी दिली.

देणगीदार, कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा, यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक मान्यवरांचे हस्ते रयत मासिक, रयत विज्ञान पत्रिका, शोध मराठी मनाचा (स्मरणिका), संस्थेच्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू जागतिक मराठी अकादमीचे गौरव फुटाने व रयत मासिकाचे कार्यकारी संपादक डॉ. सुधीर भोंगळे इत्यादींचा यावेळी सन्मान करण्यात आला. सचिव विकास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार वितरणाचे निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले. प्रो. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले.

भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, भारत हा कधीच अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन देत नसून जे काही घडले ते पाकिस्तानमुळे सुरू झाले आहे. अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळेच आपल्याला काय घडले हे कळू शकले. म्हणून आज आपण सरकारच्या पाठीशी आहोत. आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत, पण आपल्यावर जर हल्ले झाले तर आपण आपल्या रक्षणाची खबरदारी घेतली पाहिजे.

मी संरक्षण खात्याचा मंत्री असताना देशाच्या लष्करामध्ये महिलांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना केली होती. त्यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी नकार दिला. मात्र मी भारताच्या सैन्यात 9 टक्के महिला असतील असा निर्णय घेतला आणि आज संरक्षण विभागामध्ये महिला सर्वोत्तम कामगिरी बजावत आहेत. बेळगावच्या सोफिया कुरेशी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत ते म्हणाले आम्ही सगळेजण देशाच्या ऐक्यासाठी काम करत आहोत. जात, धर्म व लिंग याचा विचार आम्ही करत नाही आणि खरोखर कर्मवीरांचा हाच दृष्टिकोण होता. आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत आणि म्हणून भारत हा यावेळी एकसंघ उभा राहिला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!