रिलायन्स साठी घाईघाई , दूरदर्शनसाठी दिरंगाई मागची गोम काय? – आमदार अतुल भातखळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 23 जुलै, : महाविकास आघाडी सरकारच्या शिक्षण विभागाने अद्यापावेतो सह्याद्री वाहिनीला शिक्षणाचा प्रस्तावच पाठवला नसल्याचे उघड झाले असून रिलायन्स जिओ साठी केलेली घाई आणि दूरदर्शनबाबत होणारी दिरंगाई या मागील गोम काय असा सवाल  भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. यामुळे  पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

दीड महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने ऑनलाइन शिक्षणाकरिता रिलायन्सच्या जिओ कंपनीशी करार केला, पण ही तत्परता या सरकारला सह्याद्री वाहिनीबाबत का दाखवता आली नाही?  केवळ आणि केवळ रिलायन्सच्या जिओ बरोबर करार करण्यामध्ये निश्चितपणे काळबेरं आहे. तीन महीने उलटून गेले तरीही सह्याद्री वाहिनीला साधा प्रस्ताव पाठवलेला नाही. यावरून राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी किती अनास्था आहे हे उघड होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.

जुलै महिना संपत आला अशा वेळेला राज्यामधील विद्यार्थ्यांना फी वाढीमुळे शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइल, इंटरनेट, लॅपटॉप या नावाखाली त्यांची लूट चालू आहे आणि अशावेळेला महाविकास आघाडीचे सरकार आणि शिक्षण मंत्री मात्र स्वतःकरिता गाड्या घेणे आणि खाजगी कंपन्यांना मदत करणे याच्यात मग्न आहेत याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत असून तातडीने सह्याद्री वाहिनीवर शिक्षण संदर्भातले सर्व कार्यक्रम निःशुल्क सुरू करावेत अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!