पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा; श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे आवाहन


स्थैर्य, फलटण : अहिल्यादेवी आणि मल्हारराव होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारेच पुढे जातील. आगामी काळात या भागातील धनगर समाजासाठी योग्य दिशेने काम करण्याची गरज आहे, असे मत इंदौर संस्थानचे युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी व्यक्त केले.

होळकर राजघराण्याचे मूळ गाव असलेल्या मुरुम ता.फलटण येथील मल्हारराव होळकर यांच्या स्मारकाला रविवार दि.१४ रोजी श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी भेट दिली. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीमंत यशवंतराव होळकर बोलत होते. यावेळी आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, कागलचे श्रीमंत अखिलेशराजे घाटगे, श्रीमंत अमरसिंहराजे बारगळ, रामभाऊ लांडे, प्रतीक रजपूत, राजूआण्णा होळकर, कुंताताई यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमंत यशवंतराव होळकर म्हणाले, मला भाषण करण्याचा अनुभव नाही. मल्हारराव होळकर व माँसाहेब अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आपण सर्वांनी खूप प्रेम केले आहे. तुम्ही सर्वांनी एकदा माहेश्वरला या, निश्चितच तुम्हाला तिथली आमची संस्कृती आवडेल. या भागात आपल्या समाजाचा जो विकास व्हायला हवा होता, तो अद्यापही झालेला दिसत नाही. जरी माझे आणि गोदरेज यांचे संबंध असतील तरी आपली ओळख आधी झाली पाहिजे. फक्त भाषण देऊन उपयोग नाही, तर योग्य त्या दिशेने काम केले तरच आपण पुढे जाऊ. आपल्या समाजात जे अहिल्यादेवी आणि मल्हारराव होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवतील तेच पुढे जातील. मला राजकारणाचा अनुभव नाही आणि मला राजकारण करण्याचे ध्येय देखील नाही. फक्त मला अहिल्यादेवी यांच्या विचारावर चालायचे आहे.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे येथे आल्याबद्दल खरचच आभार मानावे लागतील. इंदौर संस्थान हे भारतातील अतिशय संपन्न असे संस्थान आहे. या संपन्न संस्थानचे मूळ पुरुष हे फलटण तालुक्यातले होते हे विशेष. तेथील अहिल्यादेवी मातांनी फक्त त्यांच्याच संस्थानाचा उद्धार केला नाही तर अखंड भारतात विहिरी, घाट यासारखी कामे करत अहिल्यादेवींनी विकास करण्याचे काम केले आहे. एवढेच नव्हे मल्हारराव होळकर यांच्यावर इतिहासातील दोन खंड असणारे असे ते सुभेदार आहेत. महादजी शिंदे व मल्हारराव होळकर हे दोन्हीही शूरवीर सातारा जिल्ह्यातीलच आहेत. मल्हारराव होळकर यांचे वंशज आज फलटणला आले आहेत. त्यांनी आता त्यांच्या धनगर समाजाचे नेतृत्व करणे गरजेचे आहे. गोदरेजचा विषय झाल्याने नक्कीच येथील माणसांना आता आशा लागल्या आहेत. उद्योगाच्या दृष्टिकोनातून या समाजासाठी काही करता येते का ? हे नक्की श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी निश्चित बघावे. आरक्षण हा ज्वलंत विषय आहेच पण या समाजाला उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आपण करावे, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की, मल्हारराव होळकर यांचे रक्तामासांचे वंशज येथे आल्याने हा एक वेगळा प्रसंग आहे. श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मोठा लढा उभारावा. राजकारणात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. अहिल्यामातांची पुण्याई अनेकांनी भोगली आहे. धनगर समाजाचे नेतृत्व अनेकांनी केले. युवराज हे फक्त धनगर समाजाचे वंशज आहेत, असे नाही तर ते गोदरेज उद्योग समूहाचे जावई देखील आहेत. धनगर समाजाला रोजगार देण्यासाठी श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी गोदरेजच्या माध्यमातून फलटण व परिसरात काम करावे. फक्त आरक्षणच नव्हे तर रोजगाराच्या माध्यमातून या समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम त्यांनी करावे, अशी विनंती श्रीमंत रघुनाथराजे यांनी केली.

दरम्यान श्रीमंत अमरजितसिंहराजे होळकर, शंकरराव माडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महानंदा दूध डेअरीचे व्हाईस चेअरमन डी.के.पवार, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, भिमदेव बुरुंगले, नितीन शाहूराजे भोसले, सुदामराव सुळ, सागर कांबळे, विनायकराव पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!