पाकिस्तानात नातेवाइकाला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेचे हरवले होते पासपोर्ट, 18 वर्षांच्या तुरुंगवासानंतर अखेर औरंगाबादला परतली


स्थैर्य, औरंगाबाद , दि. २७: पाकिस्तानमध्ये 18 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर औरंगाबाद येथील रहिवासी 65 वर्षीय हसीना बेगम मंगळवारी आपल्या घरी परतल्या. 2002 मध्ये ती आपल्या पतीच्या नातलगांना भेट देण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. त्यांचा पासपोर्ट हरवल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात डांबले.

भारतात परतल्यानंतर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलिसांनी त्यांचे स्वागत केले. घरी परतल्यानंतर हसीना म्हणाल्या की, “मी अत्यंत बिकट परिस्थितीत होती आणि आपल्या देशात परतल्यानंतर मला शांतीचा अनुभव होत आहे. मला वाटत आहे की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानात जबरदस्ती कैद करण्यात आले होते. या प्रकरणी मदत केल्याबद्दल मी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानते”

लाहोरमध्ये हरवला होता पासपोर्ट

हसीना औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशन परिसरातील रशीदपुरा येथील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी दिलशाद अहमद यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पतीने नातेवाईक पाकिस्तानात राहतात. त्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तेथे गेल्या होत्या. दरम्यान लाहोरमध्ये हसीना यांचा पासपोर्ट हरवला. हसीना पासपोर्टविनाच पाकिस्तानात आल्याचा पाकिस्तान पोलिसांनी आरोप केला. या कारणास्तव, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

औरंगाबाद पोलिसांनी त्या भारतीय असल्याची पुष्टी केली

काही वर्षांपूर्वी हसीना यांनी पाकिस्तानच्या न्यायालयात अर्ज करून आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. यावर कोर्टाने औरंगाबाद पोलिसांकडून माहिती मागवली होती. औरंगाबाद पोलिसांनी तपासणीनंतर औरंगाबादच्या सिटी चौक भागात हसीना बेगम यांच्या नावावर घर असल्याची पाकिस्तानला माहिती पाठवली. त्यानंतर कोर्टाने हसीना यांची याचिका मंजूर केली आणि गेल्या महिन्यात तिच्या सुटकेचे आदेश दिले. तीन दिवसांपूर्वी तिला तुरुंगातून सोडण्यात आले. मंगळवारी ती पंजाबमार्गे औरंगाबादला पोहोचली.


Back to top button
Don`t copy text!