
महाराष्ट्रात नवरात्रीत गरबा आयोजनासाठी विश्व हिंदू परिषदेने नियमावली जाहीर केली असून बिगरहिंदूंना प्रवेश न देण्याचे आवाहन केल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०७ सप्टेंबर : महाराष्ट्रात नवरात्री उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच गरबा आणि दांडियाच्या आयोजनावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेकडून राज्यातील गरबा आणि दांडिया आयोजकांसाठी विशेष सूचना जाहीर करण्यात आल्या असून, मुस्लिम समाजातील व्यक्तींना या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर सहभागींची ओळख पडताळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आधारकार्ड तपासणी आणि कपाळावर टिळा लावण्याचे आवाहन
विश्व हिंदू परिषदेने गरबा आणि दांडिया आयोजकांना सहभागींच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी आधारकार्ड तपासण्याची सूचना केली आहे. तसेच कार्यक्रमाच्या प्रवेशावेळी सहभागींच्या कपाळावर टिळा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्री हा केवळ नृत्याचा उत्सव नसून देवीची उपासना करण्याचा धार्मिक उत्सव असल्याने खबरदारी म्हणून या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
यंदा नवरात्री उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून त्यापूर्वीच विश्व हिंदू परिषदेने ही नियमावली जाहीर केली आहे. विश्व हिंदू परिषदेने या सूचनांना खबरदारीच्या उपाययोजना म्हटले असले, तरी या भूमिकेमुळे सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांतील समावेशकता यावरून नवीन चर्चा सुरू झाली आहे. ही केवळ विश्व हिंदू परिषदेची नियमावली असून राज्य सरकारचा अधिकृत प्रवेशबंदी आदेश नाही.