संपूर्ण समाजाचा ‘बृहद परिवार’ म्हणून विचार व्हावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मार्च २०२२ । अमरावती । मजबूत समाज संघटनेद्वारे आपण समाजातील अडीअडचणी सहकार्याने सोडवू शकतो. यासाठी समाज बांधवांनी स्वयंप्रेरणेने पुढे येण्याची गरज आहे. समाजाने उभे केलेल्या सामूहिक रचनेचे आपण लाभार्थी आहोत. असाच लाभ पुढील पिढीलाही मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. पोटजाती विसरुन संपूर्ण समाजाचा ‘बृहद परिवार’ म्हणून विचार व्हावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अखिल भारतीय कलवार कलाल कलार महासभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.  खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार केशवराव मानकर, महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरभाई पटेल, दीपक जैस्वाल, डॉ. बी. आर. काकपुरे, निवेदिता दिधडे, किरण पातुरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कलाल समाजाला महर्षी भृगूलपासून मोठी परंपरा आहे. कलाल समाजातील नागरिकांनी विविध क्षेत्रात पदार्पण करून यश मिळविले आहे. हा समाज इतर सर्व समाजांसोबत साहचर्य ठेवून आहे. समाजाच्या प्रगतीसाठी संघटन आवश्यक आहे. समाजाची ‘इको सिस्टम’ व्यक्तीला घडवून त्यास प्रगती करण्यास मदत करते. त्यामुळे प्रगती साधल्यानंतर आपणही समाजाप्रती योगदान दिले पाहिजे. समाजाच्या कृतज्ञतेची परतफेड समाजकार्याने करावी. समाजातील पोटजाती संपवून सामाजिक ऐक्य साधण्याचे कलाल महासभा संस्थेचे उद्दिष्ट स्तुत्य आहे. सर्व समाजातील सर्व लोकांचा विकास होईल, त्यावेळी भारताचा विकास होईल. त्यासाठी सामाजिक संघटन दृढ असणे गरजेचे असल्याचे करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

समाजाचा विकास साधण्यासाठी समाजबांधवांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. समाजाने पोटजाती विसरुन उपवर वर-वधूसाठी  अनुरुप जोडीदार शोधावा. तसेच लग्न संस्कारातील चुकीच्या चालीरिती दूर करण्यासाठी प्रयत्न करावे. ज्या समाजात महिलांना सन्मान देण्यात येतो तो समाज नेहमीच विकसित राहातो. कलाल समाजातर्फे ‘कलाल श्रीमती’ हा पुरस्कार समाजासाठी भूषणावह कामगिरी करणाऱ्यांना प्रदान करण्यात येतो. ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

कलाल समाजाच्या प्रगतीबाबत बोलतांना खासदार डॉ. बोंडे म्हणाले, कलाल समाज हा उद्योग, शिक्षण तसेच विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. ‘समाजातील ऐक्य’ हे समाजाला पुढे नेण्यास मदतनीस ठरते. सामूहिक उपवर युवक-युवती परिचय महासंमेलनामुळे आर्थिक तसेच वेळेची बचत होते. कलाल समाजाने यापुढेही सामाजिक एकोपा कायम राखत यशाची घोडदौड सुरु ठेवावी, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.

सत्कारमूर्तींचा सत्कार

अखिल भारतीय कलवार कलाल कलार महासभेतर्फे ‘कलाल रत्न’ म्हणून डॉ. ओंकारराव बिहाडे, आनंद भामोरे, पी.बी. उके, राजेंद्र डांगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘कलाल गौरव’ म्हणून डॉ. आशिष डगवार, लक्ष्मीनारायण मालवीय, डॉ. चित्तरंजन गांगडे, रामकृष्णराव मेश्राम व शामलाल चौथमल यांचा सत्कार करण्यात आला. ‘कलाल श्री’ म्हणून बबनराव पेलागडे, मोहनलाल जैस्वाल, वैभव फरकुंडे, अनिल मालवीय, शेषराव सहारे व उज्वल सामुद्रे यांचा सत्कार करण्यात आला. ‘कलाल श्रीमती’ म्हणून विणा पटले, स्नेहा राय, माधुरी घोसेकर, व प्राजक्ता पातुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्राजक्ता राऊत यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!