देशातील जातीयता नष्ट करून नवीन समाज निर्माण करणे हेच ध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते – भदन्त विमलकित्ती गुणसिरी


दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । मुंबई । “भारतातील सर्वात उच्च शिक्षित असूनही मला राहण्यासाठी जागा मिळत नाही अशी माझी अवस्था तर माझ्या समाजाच व माझ्या समाजाप्रमाणे इतर मागासवर्गीय समाजांच काय ? म्हणून देशात जातीयता नष्ट करून समता, स्वतंत्र, बंधुता या तत्वावर आधारित नवीन समाज निर्माण करणे हे ध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते” असे प्रतिपादन धम्म या विषयावर बोलताना पूज्य भदन्त विमलकित्ती गुणसिरी (कर्जत) यांनी केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती व पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म देशना व धम्म सहलीच्या पर्यटकांना प्रमाणपत्र वितरण असा संयुक्त कार्यक्रम मा. उपसभापती विनोदजी मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी पूज्य भदन्त विमलकित्ती गुणसिरी यांनी तथागत गौतम बुद्ध यांना पुष्यसुमन अर्पण केले तर उपसभापती विनोदजी मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पसुमन अर्पण केले, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष व विश्वस्त किशोरजी मोरे यांनी ज्योत प्रज्वलित केली तर सरचिटणीस राजेश घाडगे व खजिनदार नागसेन गमरे यांनी उदबत्ती लावली. उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ, चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, यशवंत कदम, भगवान तांबे, प्रमोद सावंत, रवींद्र शिंदे, संदेश खैरे, राजाभाऊ तथा रामदास गमरे, मुकुंद महाडिक, सुरेश मंचेकर, अंजली ताई मोहिते, संस्कार समितीचे मंगेश पवार, मनोहर मोरे असे सर्व मान्यवर उपस्थित होते त्यानीही आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पसुमन अर्पण केली. सदर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सरचिटणीस राजेश घाडगे संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार व पर्यटन समिती सचिव सुरेश मचेंकर यांनी सांभाळली.

प्रमुख वक्ते या नात्याने पूज्य भदन्त विमलकित्ती गुणसिरी आपल्या भाषणात विचार व्यक्त करत म्हणाले की “पुणे करार प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थितीचे भान राखून महात्मा गांधी यांना जीवनदान देत दोन पावले मागे घेऊनही बहुजनांच्या मागण्यां पूर्ण करून घेतल्या, बाबासाहेबांनी धर्मांतर करताना आपण कोणता धर्म घेणार हे आधी जाहीर न करता आधी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास करून अनेक गोष्टी समजून घेऊन जगमान्य अशा तथागत गौतम बुद्ध यांच्या बोद्ध धम्माचा स्वीकार केला व समाजाला धम्माची दीक्षा दिली त्यामुळे आज समाजाला धर्मांतर, दीक्षेची तसेच आठवडयातुन एकदा विहारात जाऊन अष्टशील, पंचशील ग्रहण करून आदर्श जीवन पद्धत जगण्याची गरज आहे, आज ‘जाता नाही जात ती जात’ असे म्हटल जात त्याच धरतीवर काही आडनाव ही जातीवाचक असतात अशी काही आक्षेपार्ह आडनाव बदलून बौद्ध धम्माचे प्रतिनिधित्व करणारे आडनाव धारण करावे व समाजाने एक होऊन बौद्ध धम्म प्रचार, प्रसार करावा” असे मार्गदर्शन त्यानी बाबासाहेबांचे ध्येय, त्यांचे विचार, चळवळ व धम्म विजय म्हणजे काय ? यावर दीड तास विश्लेषणाद्वारे आपले विचार व्यक्त केले.

त्याचप्रमाणे पर्यटन समितीचे अध्यक्ष मुकुंद महाडिक यांनी आपले प्रास्ताविक सादर करताना पुढील पर्यटन शिबीर व त्याच्या तारखा जाहीर केल्या, तसेच मागील पर्यटन शिबिराच्या पर्यटकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सरतेशेवटी राजेश घाडगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!