संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण तरडगाव जवळील चांदोबाचा लिंब येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या नयनरम्य सोहळ्यात वारकरी भावविभोर झाले.
स्थैर्य, फलटण, दि. 16 जुलै : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील तरडगाव जवळील ‘चांदोबाचा लिंब’ येथे पार पडले. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात लाखो वैष्णवांनी या नेत्रदीपक सोहळ्याचा अनुभव घेतला.
फलटण तालुक्यात पालखीचे स्वागत
लोणंद येथील मुक्कामानंतर पालखी सोहळ्याने खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश केला. कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव आणि अभिजित नाईक निंबाळकर यांनी सोहळ्याचे स्वागत केले.
चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण
पालखी सोहळा चांदोबाचा लिंब येथे पोहोचल्यानंतर वारकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शिस्तबद्ध उभी रांग लावली. रथापुढील सत्तावीस दिंड्यांमधून माऊलींचा अश्व धावत आणण्यात आला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यांपर्यंत नेण्यात आला आणि पुन्हा माघारी परतला. यावेळी वारकऱ्यांनी गायलेल्या भारूड आणि भजनांनी वातावरणात अधिकच रंगत आणली.
अश्वाची दौड आणि भाविकांची गर्दी
माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यावर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून नैवेद्य दाखवला. त्यानंतर पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या रिंगणानंतर पालखी सोहळा तरडगाव येथील पालखीतळावर विसावला.