क्रीडाविषयक कामगिरी उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करावे – क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार


स्थैर्य, मुंबई, दि.३०: राज्याची क्रीडाविषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य शासनाचा क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

लष्कर आणि एनसीसी यांच्यासमवेत मंत्रालयातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सेवानिवृत ब्रिगेडिअर सुधीर सावंत, एनसीसी महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय.पी.खांडुरे यांची उपस्थिती होती.

क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार म्हणाले,ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्त्व देत आहेत. महाराष्ट्रात क्रीडा विषयक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि त्या दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सेवानिवृत ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी दिलेल्या निवेदनाविषयी बोलताना श्री. केदार म्हणाले राज्याला क्रीडा प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. लष्करातील तिन्ही दलांकडे विभागात उत्कृष्ट प्रशिक्षक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच एनसीसीकडेही विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. लष्कर आणि एनसीसीकडे असणाऱ्या सुविधा राज्यातील विविध भागामध्ये उपलब्ध आहेत.या सुविधांचा राज्यातील तरुण खेळाडूंकरिता उपयोग करण्यासाठी क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. आज झालेल्या बैठकीत सर्वांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्ग येथील क्रीडा संकुल एनसीसीकडे प्रायोगिक तत्वावर  देण्याविषची माहिती घेऊन निर्णय घेण्यात येणार असून या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!