मालोजीराजे बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । फलटण । श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार संचालक मंडळाशिवाय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील ५ व्यक्तींच्या व्यवस्थापन मंडळाची नियुक्ती केली आहे.

नागरी सहकारी बँकांवर नियंत्रण मिळविण्याकरिता रिझर्व्ह बँकेने मालेगम समितीच्या शिफारशीनुसार संचालक मंडळाव्यतिरिक्त तज्ञ व्यक्तींचे व्यवस्थापन मंडळ स्थापन करणे अनिवार्य केले असून नागरी क्षेत्राच्या भल्यासाठी हा निर्णय योग्य व फलदायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या निर्णयामुळे नागरी बँकांच्या व्यवस्थापन मंडळामध्ये विशेष ज्ञान व व्यवसाईक व्यवस्थापन कौशल्ये असणाऱ्या तज्ञ सदस्यांचा अंतर्भाव होऊ शकेल असे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. याशिवाय नियंत्रण अधिक सक्षम व सुदृढ करणे आणि व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी निर्माण करण्याकरिता नियमांप्रमाणे १०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या नागरी सहकारी बँकांनी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची (व्यवस्थापन समिती) स्थापना करणे आवश्यक आहे.

या व्यवस्थापन मंडळातील सदस्य हिशोब शास्त्र, अर्थशास्त्र, शेती व ग्रामीण अर्थशास्त्र, सहकार, कायदा, लघु उद्योग, माहिती तंत्रज्ञान व बँकेला उपयुक्त असणाऱ्या अन्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती असतील, या व्यवस्थापन मंडळास रिझर्व्ह बँकेची मान्यता आवश्यक आहे.

रिझर्व्ह बँकेचे नवे धोरण व मान्यतेनुसार श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील ५ तज्ञ व्यक्तींचे व्यवस्थापन मंडळ तयार करुन रिझर्व बँकेकडे पाठविले असता रिझर्व्ह बँकेने त्याला मान्यता दिली असून नव्या व्यवस्थापन मंडळाचे प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले आहे.

नवीन व्यवस्थापन मंडळात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष, सुव्रत शिरीष देशपांडे पुणे सदस्य, अड. शैलेंद्र शांतीलाल शहा फलटण सदस्य, आशिष मोहदरकर पुणे सदस्य, चेतन गट्टानी सी ए पुणे सदस्य, राजेश बन्सीलालजी लढ्ढा मुख्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध सदस्य आहेत.


Back to top button
Don`t copy text!