लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे – राज्यपाल


दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । मुंबई । देशात होत असलेले बहुचर्चित साहित्य महोत्सव (लिटफेस्ट) अधिकांश इंग्रजी भाषेतून होतात. इंग्रजी भाषेत उत्तम साहित्य आहे आणि साहित्यिक आहेत, याबाबत दुमत नाही. परंतु हिंदी, बंगाली, मराठी यांसह भारतीय भाषांमध्ये अतिशय समृद्ध साहित्य आहे. महाराष्ट्रात आल्यावर येथील साहित्य किती संपन्न आहे हे समजले. त्यामुळे साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी आज ७ व्या जागतिक साहित्य महोत्सवाचे (7th Global Literary Festival) उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसीय साहित्य महोत्सवाचे आयोजन एशियन अकादमी ऑफ आर्ट व इंटरनॅशनल चेंबर ऑफ मिडिया एंड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीने केले आहे.

चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी भाषा मॉरिशस, त्रिनिदाद, अरबी देश व भारताच्या शेजारील देशात उत्तमपणे समजली जाते. हिंदी भाषा माहिती असल्यामुळे आपल्याला मराठी भाषा समजणे अतिशय सोपे गेले. भारतीय भाषांमध्ये बंकिमचंद्र, मुन्शी प्रेमचंद, सुब्रमण्य भारती असे एकापेक्षा एक सरस साहित्यिक आहेत. त्यामुळे साहित्य महोत्सव केवळ इंग्रजी साहित्य महोत्सव न होता सर्वसमावेशक भारतीय साहित्य महोत्सव व्हावे अशी अपेक्षा कोश्यारी यांनी व्यक्त केली.

उद्घाटन सोहळ्याला उझबेकीस्तान, त्रिनिदाद टोबॅगो, बुर्कीना फासो यांसह विविध देशांचे भारतातील राजदूत व उच्चायुक्त, संमेलनाध्यक्ष संदीप मारवाह, इंद्रजीत घोष, चित्रपट निर्माते अनिल जैन, लायन्स क्लबचे गौरव गुप्ता, डॉ. शिखा वर्मा, सुशील भारती तसेच साहित्यिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!