राऊतवाडी ग्रामस्थांनी ‘ भ्रम’ च्या माध्यमातून कोरोना विषयी केले प्रबोधन


 

राऊतवाडी येथे शॉर्टफिल्म ‘ भ्रम’ मध्ये सहभागी झालेले ग्रामस्थ

कोरोनावर मात करून आलेल्या तरुणाकडे पाहण्याचा समाज्याचा दृष्टिकोन यावर भाष्य करणारा काल्पनिक लघु-चित्रपटलॉकडाऊनच्या काळात तरुणांचा प्रबोधनचा प्रयत्न : शॉर्टफिल्म मध्ये सर्व गावकरीच

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि.११ :  राऊतवाडी ता.कोरेगाव येथील ग्रामस्थांनी स्वतःच व्यक्तीरेखा साकारुन  शॉर्टफिल्मच्या माध्यमातून  कोरोनावर मात करून आलेल्या तरुणाकडे पाहण्याचा समाज्याचा दृष्टिकोन यावर भाष्य करणारा काल्पनिक परंतु वास्तविक ‘भ्रम’  नावाचा लघु-चित्रपट तयार केला आहे.त्यांच्या प्रबोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरेगाव तालुक्यातील राऊतवाडी हे अडीचशे उंबऱ्याचे छोटेशे गांव. कोरोनाच्या या महामारी संकटाने  सर्वच लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे.याच बरोबर या कोरोना संसर्गाचा ज्या पध्दतीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे,त्याऐवजी लोकं ज्यांना कोरोना झाला त्यांना  हीन वागणूक देत आहेत. राज्यांतील मागील दोन ते तीन महिन्यात मुंबई-पुणे शहरात कोरोनाचे हजारोंच्या संख्येनें रुग्ण वाढू लागले,आणि दररोज यातून हजारोंच्या संख्येनें बरे सुध्दा झाले,त्याचं दरम्यान महामारीच्या संकटातून काहीजण आपल्या गावाकडे येऊ लागले. मात्र गावाकडे सुरक्षित असणाऱ्या लोकांना आपलीच शहरांतील माणसं या आजारानें नकोशी वाटू लागली आहेत. अनेक जण आजही मुंबई पुणेहून जवळची माणसं आली तर लगेच काहीही कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.मुंबई मध्ये युवकाला कोरोना होऊन तो बराही झालेला असतो.मात्र त्याचे मित्र त्याला जवळ करीत नाही, त्याला टाळण्याचा व लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे तो अशा वागण्याला वैतागलेला व निराश झालेला असतो, म्हणून त्याचे वडील त्याला गावी असणाऱ्या भावाकडे  पाठवतात, परंतु या ठिकाणीही गावी चौदा दिवस होम कोरंटाईन (विलगीकरण) होऊन सुध्दा आपल्या गावाकडचे माणसं, मित्र,सगेसोयरे कोरोनाच्या संसर्ग माहिती विषयी अज्ञानपणामुळे जवळ करतं नाहीत.मूळ आजारा विषयी व्यवस्थित माहिती व काळजी घेण्याऐवजी त्यावेळेस माणुसकी हरपली की काय ? गावाकडे येऊन सुध्दा निराशा होते.माणसातील समज,गैरसमज व भ्रम या आशयावर आधारित व  समाजातील व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी शॉर्टफिल्म राऊतवाडी ग्रामस्थांनी बनवली आहे.विशेष म्हणजे या फिल्म मधील सर्व व्यक्तिरेखा गावांतील लोकांनी केल्या आहेत. बहुतांशी पात्रही त्याच क्षेत्रातीलच आहेत. तसेच कुठेही अद्यावत केमरा नाही, नवीन टेक्नॉलॉजी व तंत्र नाही. सर्व चित्रिकरण गावातच, दिग्दर्शन, कथा, कलाकार सर्व काही गावकऱ्यांचेच साधी स्टोरी मात्र विषयाला प्रबोधन आणि कलेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सशक्त उंची दिली आहे.सध्या ही शॉर्टफिल्म सोशल मिडीयावर भागात चर्चेचा विषय झाली असून शहरांतील आपल्याच नातेवाईकांची वास्तव वेदना न बोलता प्रत्येकाशी जोडली व मांडल्याची असल्याची भावना व  प्रतिक्रिया फिल्म पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटत होती. लेखक नवनाथ पुजारी, दिग्दर्शन वैभव पुजारी, चित्रिकरण उदय पुजारी, भूषण शेलार, अविनाश सावंत, प्रताप नावडकर, रघुनाथ कदम, मोहन कदम, प्रदीप अहिरेकर, आदी कलाकार यांनी सादरीकरण केले आहे. दरवर्षी हे गांव आजही ग्रामदैवतेच्या यात्रेनिमित्त गावपातळीवर नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते. आत्तापर्यंत नवनव्या वेगवेगळयावर विषयावर प्रयोग केले आहेत. विशेषतः आजही गावकरी यात हिरारीनें भाग घेत आहेत. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!