रजनीकांत यांचा प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय, चाहत्यांची मागितली माफी


स्थैर्य, दि.२९: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या बिघडलेल्या तब्येतीमुळे निवडणुकीच्या राजकारणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीला उभे न राहता बाहेरून लोकांची सेवा करू, असे त्यांनी मंगळवारी तमिळमध्ये लिहिलेल्या एका पत्रात सांगितले. याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.

डॉक्टरांनी रजनीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला

रजनीकांत यांना रक्तदाबातील चढउतार आणि थकवा जाणवल्यामुळे 25 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर त्यांना सुटी देण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी रजनी यांना एक आठवड्यापर्यंत बेड रेस्ट, किमान शारीरिक क्रियाकलाप आणि कोरोनापासून वाचण्याचा सल्ला दिला होता.

31 डिसेंबर रोजी नवीन पक्षाची घोषणा करणार होते

रजनीकांत यांनी पक्ष स्थापन करण्याचा आणि 2021 विधानसभा निवडणूक लढणार असल्याची 3 डिसेंबर रोजी घोषणा केली होती. तसेच 31 डिसेंबर रोजी नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले होते.

वर्षभरापूर्वी कमल हासनशी युती करण्याबाबत सांगितले होते

राजकारणात अभिनेता कमल हसनसोबत युती करणार असल्याचे रजनीकांत यांनी गेल्यावर्षी सांगितले होते. रजनीकांत यांनी त्यावेळी म्हटले होते की, जर कमल हासन यांच्याशी युती करण्याची स्थिती झाली तर राज्यातील लोकांचे हित लक्षात घेऊन ते निश्चितपणे एकत्र येऊ.

रजनीकांत जर निवडणुकीत उतरले असते तर ते राजकारणात येणारे दाक्षिणात्य चित्रपटांमधील 8 वे दिग्गज ठरले असते. अशा मोठ्या नावांमध्ये डॉ. एमजी रामचंद्रन, एम करुणानिधी, जे जयललिता, कमल हसन, विजयकांत, सरत कुमार आणि करुनास यांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!