फलटणमधील अतिक्रमणांविरोधात आंदोलन सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नगरपालिकेसमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी युवराज शिंदे, मितेश खराडे, अशोकराव जाधव, नरसिंह निकम, सचिन अहिवळे आदी.


स्थैर्य, फलटण दि.२२: फलटण शहरातील अर्धवट राहिलेली अतिक्रमण मोहीम पुन्हा चालू करावी, मोठ्यांची अतिक्रमणे तातडीने काढावीत, यापूर्वी अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण झाल्याने ती ताबडतोब काढावीत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात नगरपरिषदेच्या मुख्य दरवाजासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काका खराडे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात विविध घटकांनी आणि नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठींबा दिला. 

यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात युवराज शिंदे व मितेश खराडे यांनी म्हटले आहे कि, फलटण शहरातील अतिक्रमण मोहिम बरेच दिवसापासून काही तांत्रिक कारणाने चालू होत नव्हती. परंतु 8 महिन्यापूर्वी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अतिक्रमण मोहिम सुरु केली. त्यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेने त्यांचे स्वागत केले. परंतु कोरोनाचे कारण पुढे करत अतिक्रमण मोहिम अर्धवट सोडण्यात आलेली आहे. अतिक्रमण मोहिमेत फलटण नगरपालिकेने गोरगरीब जनतेची अतिक्रमणे काढलेली आहेत. मात्र बड्या धेंडयाची अतिक्रमणे तशीच आहेत. मोठ्यांची अतिक्रमणे तशीच राहील्याने व्यापारी व जनतेमध्ये फलटण नगरपरिषदने अन्याय केला असल्याची भावना निर्माण झालेली आहे. दरम्यान अतिक्रमण मोहीमेत अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा पक्क्या व कच्च्या स्वरूपाची बांधकामे वेगाने होऊ लागली आहेत. 

जास्त रहदारी असणार्‍या चौकातील अतिक्रमण काढलेल्या पत्र्याच्या शेड खालील सिमेंटचे कठडे तसेच असून रस्ता पूर्वीप्रमाणेच अरुंद राहिल्याने व त्याचा राडा रोडा अवती भवती पडल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याची केलेली मोहिम म्हणजे फक्त दिखाऊपणा तर नाही ना ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. म्हणून फलटण नगरपालिकेने कोणतीही सबबी न सांगता अर्धवट राहिलेली अतिक्रमण मोहीम ताबडतोब चालू करून बड्या धेंडांसह सरसकट अतिक्रमणे काढावीत असे युवराज शिंदे व मितेश खराडे यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, अतिक्रमणा विरोधात सुरु झालेल्या आंदोलनात फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.नरसिह निकम, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, भाजपा उपजिल्हा अध्यक्ष रविंद्र फडतरे, माजी नगरसेवक राजेश शिंदे, भाजपाचे शहर अध्यक्ष अमोल सस्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, मेहबूब मेटकरी, प्रितम जगदाळे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल पवार, मनसेचे उपतालुका प्रमुख निलेश जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, शहर अध्यक्ष महादेव गायकवाड, वंचितचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, दलित पँथर फलटण तालुकाध्यक्ष मंगेश आवळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल शहा, उषा राऊत, सुभाष जेबले, ऍड. अजित फाळके व सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!