मराठा आरक्षण : उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली नवी दिल्लीतील सरकारी वकिलांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि. ६ : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवी दिल्ली येथील सरकारी वकिलांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा आढावा घेतला. 

नवी दिल्ली येथे झालेल्या या भेटीत श्री. चव्हाण यांनी सरकारी वकील राहुल चिटणीस व सचिन पाटील यांच्याशी विचारविनिमय केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गावर गंभीर परिणाम झाले असून, या प्रकरणी कायदेशीर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये राज्यसरकारने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया यांच्या सल्ल्याबाबतही अशोक चव्हाण यांनी उभय वकिलांकडून विस्तृत माहिती घेतली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे एसईबीसी प्रवर्गाचे नोकर भरतीतील उमेदवार व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी कायदेशीर तोडगा काढण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही उणीव राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देखील श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले. 

मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी लेखी मागणी राज्य शासनाने यापूर्वी तीन वेळा केलेली आहे. राज्य शासनाच्या या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे 2 नोव्हेंबर रोजी सूचित करण्यात आले. यासंदर्भातील अर्ज 20 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला होता व 7 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर व 2 नोव्हेंबर रोजी तो मेन्शनही करण्यात आला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!