भारताचा 2-1 ने मालिकेवर ताबा:ऑस्ट्रेलियात 328 धावांचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले, ऋषभ-सिराज यांनी यजमानांकडून मालिका हिसकावली


स्थैर्य, दि.१९: टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सनी पराभूत इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियात आपले सर्वात मोठे 328 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिका 2-1 ने खिशात घातली. याआधी भारताने 2003 च्या एडिलेट कसोटीत 233 धावांचे सर्वात मोठे लक्ष्य पार केले होते.

ब्रिस्बेनमध्ये तीन दशकांनंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव

यजमान ऑस्ट्रेलियाने 32 वर्षानंतर ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदाच कसोटी गमावली आहे. मागील वेळी ब्रिस्बेनमध्ये नोव्हेंबर 1988 मध्ये वेस्टइंडीजने 9 गड्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. 1988 नंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये 31 कसोटी सामने खेळले होते, त्यातील 24 जिंकले आणि 7 अनिर्णित राहिले.

भारताने गाबामध्ये पहिली कसोटी जिंकली

तर भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकला आहे. या सामन्याआधी टीम इंडियाने 6 कसोटी सामने खेळले होते, त्यातील 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता आणि एक अनिर्णित राहिला होता.

भारताने 16 पैकी 10 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली किंवा रिटेन केली

1996 पासून भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत भारताने 16 पैकी 10 ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने केवळ 5 मालिका जिंकल्या आहेत.

गाबामध्ये प्रथमच 300+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात आला

गाबामध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने 300+ धावांचे लक्ष्य पार केले. यापूर्वी येथे 236 धावांच्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग करण्यात आला. नोव्हेंबर 1951 मध्ये ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली होती.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 294 धावा

सामन्यान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 369 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला 336 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 294 धावसंख्या उभारली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्या आधारे भारतापुढे 328 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 329 धावा करून सामना खिशात घातला

चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक

चेतेश्वर पुजारा 211 चेंडूत 56 धावांची खेळी करून बाद झाला. हे त्याच्या कारकिर्दीतील 28 वे अर्धशतक होते. पुजाराने 196 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वात मंद गतीचे अर्धशतकही होते. यापूर्वी त्याने याच मालिकेच्या सिडनी कसोटी सामन्यात 174 चेंडूत अर्धशतक केले होते.

पंतच्या कसोटीत एक हजार धावा पूर्ण झाल्या

ऋषभ पंत सर्वात कमी कसोटी डावात एक हजार धावा करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. याबाबतीत त्याने माजी यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीला मागे टाकले. पंतने 27 डावात ही कामगिरी केली. तर यासाठी धोनीला 32 डावांचा सामना करावा लागला होता.

नर्व्हस 90 चा शिकार ठरला शुभमन

भारतीय सलामीवीर शुभमन गिल 146 चेंडूत 91 धावा करून बाद झाला. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे दुसरे अर्धशतक आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या देखील आहे. फिरकीपटू नाथन लियोनच्या चेंडूवर स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथने त्याचा झेल टिपला. शुभमनने चेतेश्वर पुजारा सोबत मिळून दुसऱ्या विकटेसाठी 114 धावांचा महत्वाची भागीदारी केली.

सिराजचे 5 बळी; 44 वर्षांनंतर मदन लाल यांच्या कामगिरीला उजाळा

भारताकडून सिराज व शार्दूलने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 294 धावांत गुंडाळले. यात सिराजने 5 व शार्दूलने 4 बळी घेतले. यातून ऑस्ट्रेलियाचा मोठ्या आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज सिराजने 44 वर्षांनंतर सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. यापूर्वी 1977 मध्ये मदन लालने 71 धावा देत पाच विकेट घेतल्या होत्या. आता सिराजने तब्बल 44 वर्षांनंतर या कामगिरीला उजाळा दिला आहे. त्याची यादरम्यानची गोलंदाजी लक्षवेधी ठरली.


Back to top button
Don`t copy text!