निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी


या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो.

जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याला आपण काही नियम घालून दिलेले असतात. त्यामुळे आपले स्वतःचे आयुष्य हे सुखकर होत असते. त्याप्रमाणेच निवडणूक लढवितांनाही भारतीय निवडणूक आयोगाने काही बंधने नियम घालून दिलेले आहेत त्याचे पालन आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि निवडणूक लढवितांना दोन्ही वेळेस केल्यास फायदाच होतो .

सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी हे महत्त्वाचे आहे. कारण, यावेळी ऐकणारा वर्ग /प्रेक्षक/ नागरिक हा मोठा असतो. त्यामुळे त्याचे पडसाद समाजात सकारात्मक तसेच नकारात्मक ही होऊ शकतात. म्हणून निवडणूक प्रचार प्रसाराच्या वेळेस राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण, हेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी भारतीय संसदेत बसून कायद्याचे राज्य चालवितात त्यावेळी त्यांना सर्वसमावेशक विचार करावा लागतो. तीच भावना त्यांनी निवडणुकीच्या काळात पक्षाचे ध्येय धोरणे मांडताना तसेच मतदारसंघातील मुद्दे मांडताना विचारपूर्वक ठेवावी.

निवडणुकीचा प्रचार-प्रसार करताना जातीपाती वरून कुठलेही आक्षेपार्य भाषण देता येत नाही. तसेच जातीचा उल्लेख करणे राजकीय पक्षांनी टाळायला हवे. कुठली एक जात श्रेष्ठ आणि कुठली एक जात निम्न असे न बोलता पक्षाचे ध्येय धोरणे अथवा भविष्यात जनतेला आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा बद्दल बोलणे जास्त सुसंगत असते.

ज्याप्रमाणे जातीपातीवर बोलणे टाळले पाहिजे त्याप्रमाणेच धर्म द्वेष न करता एखाद्या धर्माला विशेष महत्त्व न देता आपल्या संविधानामध्ये जो सर्वधर्म समभावाचा संदेश आहे तो जोपासणे आणि त्या परीने आपल्या राजकीय पक्षांचा अथवा उमेदवारांनी स्वतःचा प्रचार प्रसार करणे अपेक्षित आहे.

भारतीय घटनेच्या उद्देशिकेत सामाजिक सलोखा पाळणे असे उल्लेखित असून सामाजिक सलोखा असल्यास समाजाची प्रगतीच होते अधोगती होत नाही याचे भान निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी ठेवल्यास निवडणूक चा हा काळ सर्वांसाठी सूसह्यय आणि प्रबोधनाचा ठरेल.

निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार हे प्रभावी व्यक्तिमत्व असतात. त्यामुळे त्यांचे असंख्य फॉलोवर्स अनुयायी असतात. जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून बऱ्याच गोष्टी शिकून स्वतःच्या आयुष्यात त्याप्रमाणे वागतात. निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराने कायदा व सुव्यवस्था पालन करून त्याप्रमाणे प्रचार प्रसार केला तर आपसूकच त्यांचे फॉलोवर्स अनुयायी देखील त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था पालन करतील. त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कर्तव्य आहे.

आताचा काळ हा सामाजिक माध्यमाचा काळ आहे. माध्यमांवर लाखो फॉलोवर्स असतात जे आपल्या नेत्याला उमेदवाराला फॉलो करतात या समाज माध्यमांवर एक संदेश खूप मोठी हानी करू शकतो त्याप्रमाणे प्रबोधनही करू शकतो. त्यामुळे सामाजिक माध्यमाचा वापर करताना तो काळजीपूर्वक विशेषतः निवडणुकीच्या काळात अधिक जागरूकपणे करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याचे कुठलेही वाईट पडसाद उमटणार नाहीत.

निवडणुकीचा काळाचे वातावरण भारावलेले असते त्यामुळे शब्दच्छलाने शब्द भेद तयार होऊन एखादा वाद विकोपाला जाण्याचे नाकारता येत नाही अशावेळी कार्यकर्ता प्रवक्त्यांमध्ये स्पष्टता हवी.

अंततः सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक ही कोणासाठी आहे निवडणुकीच्या मागचा उद्देश काय आहे मतदान कशासाठी करायला हवे मतदार कोण आहे कारण संपूर्ण निवडणूक ही भारताचे नागरिक म्हणजेच मतदार ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत असे नागरिक या सर्व प्रक्रियेचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. त्यामुळे मतदान का करावे यासंदर्भात जागृतीची प्रयत्न राजकीय पक्षांकडून उमेदवारांकडून होणे गरजेचे आहे. मतदार जागृती उपक्रम अधिकाधिक केल्यास मतदानाचा टक्का वाढेल आणि एका चांगल्या लोकशाहीला ते पोषक असे ठरेल त्यामुळे या सर्व निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असून मतदार जागृती त्यांच्यावतीने अधिकाधिक व्हावी असे अपेक्षित आहे.

– अंजु कांबळे निमसरकर,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय बीड


Back to top button
Don`t copy text!