निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । सातारा । संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे. निसर्गवारी ग्रुप वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

पुनर्वसीत डिचोली (धोंडेवाडी) (ता. कराड) येथे निसर्गवारी 2021 अंतर्गत आयोजित ‘संकल्प 221 वृक्ष लागवडीचा’ या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील. सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, डॉ. अमित खाडे तसेच जि.प. सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेखर सिंह म्हणाले, निसर्ग वारीच्या माध्यमातून हाती घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ङ्गझाडे म्हणजे देव आहेफ झाडांमधील देवाला ओळखून निसर्ग वारीच्या माध्यमातून काम झाले आहे. निसर्गवारी ग्रुप जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ  आहे.

जर्मनीमध्ये अतिवृष्टी होऊन पूर आला. त्यामध्ये 180 ते 200 लोकांचे मृत्यू झाले. अरबी समुद्रात कधी सायक्लॉन येत नव्हते परंतु 2001 पासून ते येऊ लागले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये 50 डिग्री सेल्सीअस होते. याला कुठे न कुठे माणूसच जबाबदार आहे. वृक्षतोड कारणीभूत आहे. या परिस्थितीत निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल.

पहिला पाऊस जून-जुलै, ऑगस्ट मध्ये पडत होता. मात्र गेली 10 ते 15 वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे लावण्यामध्ये मोठा वाटा शेतकरी बांधवांचा वाटा असला पाहिजे. आपण आषाढी वारी निमित्त झाडे लावतो आहे. आपण विठ्ठलाचे रुप म्हणून त्याचे संगोपन करा. डिचोली ग्रामस्थ झाडांची काळजी घेतील. सयाजी शिंदे सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना राबवित असतात. सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीबाबत चळवळ उभी रहात आहे, याचे समाधान आहे.

सतीश मोरे म्हणाले, 2015 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे. मागील वर्षी मनमंदिर  वारी केली. यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता. ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून 221 वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला. आळंदी ते पंढरपूर अंतर 221 कि.मी.असल्यामुळे येवढी झाडे लावली. प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे.  डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला. येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे. आज वारी सार्थकी लागली आहे. ‘याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा’, याची प्रतिची आली.

बाळासाहेब कोळेकर म्हणाले, तीन ठिकाणी पुनर्वसीत झालेल्या डिचोली गावाच्या काही अडचणी आहेत. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत. निसर्ग वारीमुळे येथील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे.प्रास्ताविक  व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले.आभार सुरेश चौघुले यांनी मानले.यावेळी डिचोली येथे 104 वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारु  परिवाराच्या वतीने करण्यात आले.

वडाची डिचोली म्हणून गाव ओळखले जाईल

पुनर्वसीत डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी गु्रपने घेतला आहे. आज येथे 104 झाडे लावण्यात आली आहेत. यातील 75 झाडे वडाची आहेत. येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!