बेळगाव:पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामफलकाचे जल्लोषात अनावरण, छत्रपती शिवाजी चौक नाव कायम ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारची मध्यस्ती


 

स्थैर्य, बेळगाव, दि.४: पिरनवाडी येथील पुतळ्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावर पडला आहे. चौकाला छत्रपती शिवरायांचेच नाव कायम राहील अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली. यानंतर पिरणवाडी येथील शिवाजी चौकात ग्रामस्थांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाचा भव्य फलक उभारुण आज जल्लोष केला. हर हर महादेव गजर आणि शिवरायांचा जयजयकाराने परिसर दणाणून गेला. आता मनगुत्तीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुन्हा सन्मानाने कधी विराजमान होणार याकडे सर्व शिवप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

पिरनवाडी येथील चौकात ग्रामस्थांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा चौक वर्षानुवर्षे छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जातो. पण काही कानडी संघटनांनी गेल्या आठवड्यात या चौकात क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा अचानक रातोरात बसवून, मराठी विरुद्ध कानडी असा वाद निर्माण केला. दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याने, येथे काही दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता. यानंतर लगेचच पिरनवाडीत घडलेल्या प्रकाराने सीमाभागात वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.

या सर्व प्रकरणाची कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दखल घेत, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमर कुमार पांडे यांना बेळगावला पाठवले होते. त्यांनी घेतलेल्या दोन्ही गटांच्या बैठकीत क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा सध्या आहे, त्याच ठिकाणी बसवायचा आणि चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्यायचे असा तोडगा काढला होता. त्यानुसार आज पिरनवाडीत सकाळी शिवप्रेमींनी चौकात भव्य अशा “छत्रपती शिवाजी महाराज चौक” नामफलकाचे अनावरण केले. यावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवरायांच्या नामाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!