फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाचे व्यवहार आज बंद : श्रीमंत रघुनाथराजेबळीराजाच्या न्यायहक्कासाठी ‘भारत बंद’ला पाठींबा


 

स्थैर्य, फलटण दि.८: केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात आज दि.8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ ला फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा पूर्णत: पाठींबा असून बाजार समितील शेतमालाचे व्यवहार आज बंद राहणार आहेत. विशेषत: कांदा मार्केट, भाजी मंडई देखील संपूर्ण बंद ठेवण्यात येणार असल्याचे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगीतले की, केंद्र शासनाने कृषि विषयक तीन कायदे पारित केलेले आहेत त्यास विरोध म्हणून आणि आपल्या बळीराजाच्या न्यायहक्कासाठी देशातील विविध शेतकरी संघटना ,कामगार संघटना आज दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंद ठेवणार आहेत. या बंद मध्ये सहभागी होण्याचा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने निर्णय घेतलेला असून राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात येत आहेत. त्यानुसार शांततेच्या मार्गाने, कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेवून आपणही सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे. यास्तव आपल्या फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती मधील सर्व शेतमालाचे व्यवहार विशेषतः कांदा मार्केट,भाजी मंडई पूर्णतःबंद ठेवण्यात येत आहे. 

दरम्यान, बळीराजाच्या न्याय हक्कासाठी आज दि.8 रोजी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद राहणार असून सर्व शेतकरी बंधू, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी व इतर घटकांनी बाजार समितीस सहकार्य करण्याचे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, संचालक यांच्यासह सचिव शंकर सोनवलकर यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!