मध्य प्रदेशातील 1 हजार 13 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने स्वगृही रवाना


स्थैर्य, सिंधुदुर्ग, दि. 21 : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे आज तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्य प्रदेशातील जबलपूरकडे रवाना झाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 13 मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.

यावेळी प्रवाशांना जिल्हा प्रशासनाच्यवतीने सर्व कामगार व मजुरांची वैद्यकीय तपासणी करुन पाण्याची बाटली, मास्क, साबन व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 910 व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 96 व्यक्ती, देवगड तालुक्यातील 7, मालवण तालुक्यातील 239, कणकवली तालुक्यातील 267, सावंतवाडी तालुक्यातील 96, दोडामार्ग तालुक्यातील 93 व्यक्ती, वैभववाडी तालुक्यातील 35,  वेंगुर्ला तालुक्यातील 77 तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 103 व्यक्ती एकूण 52 एस.टी बस मधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतूकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक,  स्टेशन मास्तर वैभव दामले, देवगडचे नायब तहसिलदार प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांची बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूणच पुरुष महिला, लहान मुले, वृद्ध यांची घरी जाण्यासाठीची मोठी लगबग या ठिकाणी पहावयास मिळाली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!