फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज


स्थैर्य, फलटण, दि. १७ : फलटण तालुक्यातील ८० पैकी ६ ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध पार पडल्या असून उर्वरित ७४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार दि. १५ रोजी अत्यंत चुरशीने ७१.८४ % मतदान झाले आहे. सोमवार दि.१८ रोजी मतमोजणीचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आल्याने दुपारी १ वाजेपर्यंत मतमोजणी होऊन सर्व निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव यांनी व्यक्त केली आहे.

मतमोजणी साठी नेहमीप्रमाणे २० टेबल्स ठेवण्यात येणार आहेत, मात्र पहिल्या तासात कोणत्या, दुसऱ्या तासात कोणत्या, तिसऱ्या तासात कोणत्या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार हे आगाऊ जाहीर करण्यात आल्याने त्याप्रमाणे मतमोजणीसाठी उमेदवार, काउंटिंग एजंट, कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार असल्याने कोणालाही सकाळ पासून थांबून रहावे लागणार नाही, आपल्या वेळेत उपस्थित राहुन निकाल जाहीर होताच तेथून बाहेर पडणे सोईचे होणार आहे.

सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार असून पहिल्या तासात कोळकी, गुणवरे, हिंगणगाव, राजुरी, पिंपळवाडी, सरडे, मुंजवडी, जाधववाडी (फ), राजाळे, फडतरवाडी, निंबळक, आणि ढवळ या १२ ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात येणार आहे.

सकाळी ९ ते १० या वेळेत सांगवी, जिंती, सस्तेवाडी, पवारवाडी, खामगाव, जावली, वाखरी, काळज, मुरुम, होळ, वडगाव, जाधववाडी (ता), कुरवली बु||, नाईकबोमवाडी, हनुमंतवाडी, शिंदेनगर, साठे, विंचुरणी, शेरेचीवाडी(ढ), मलवडी, घाडगेमळा, मुळीकवाडी, वडजल, शिंदेवाडी, कोऱ्हाळे या २५ ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात येणार आहे.

सकाळी १० ते ११ या वेळत ठाकुरकी, फरांदवाडी, नांदल, झिरपवाडी, निंभोरे, खराडेवाडी, कोरेगाव, कापडगाव, आरडगाव, तांबवे, रावडी बु||, भिलकटी, कापशी, मिरढे, सोनगाव, धुळदेव, अलगुडेवाडी, टाकळवाडे, कांबळेश्वर, तावडी, खुंटे, धुमाळवाडी, सासकल, भाडळी बु||, तिरकवाडी, सोनवडी बु|| आणि आंदरुड या २८ ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात येणार आहे.

सकाळी ११ ते १२ या वेळेत सोनवडी खु||, आळजापूर, शेरेचीवाडी(हिं), बिबी, घाडगेवाडी, शेरेशिंदेवाडी, पिराचीवाडी, बोडकेवाडी आणि निरगुडी या ९ ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात येणार आहे.

निरीक्षक तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण प्रक्रियेची रचना उत्तम प्रकारे नियोजन पूर्वक केली असल्याने अंतीम टप्यातील मतमोजणी पर्यंतचे सर्व टप्पे शांततेत पार पडले आहेत. आता मतमोजणीची रचनाही ज्यांची मतमोजणी आहे, त्याच गावातील लोक उपस्थित राहु शकतील अशी केल्याने कोणालाही ताटकळत न राहता गर्दी गोंधळ विरहीत मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होता येईल अशी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!