लाडक्या गणरायाचे आगमन मात्र उत्साह दिसलाच नाही अनेक मंडळांची परंपरा खंडित


 

राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश

यावर्षी कोविड योध्द्यांचा सन्मान सोहळा सामाजिक उपक्रम

स्थैर्य, सातारा, दि. २२ : दरवर्षी ढोल-ताशे आणि गुलालाच्या उधळणीत गणेश चतुर्थीला दिसणाऱ्या मिरवणुका मात्र यावर्षी  कोरोना  मुळे रद्द झाल्याने आज शनिवारी सकाळपासून सातारा शहरात नेहमीच चे उत्साही वातावरण दिसत नव्हते. आज सकाळ पासून घरगुती गणेश मूर्ती भरपावसात घरी नेण्यासाठी लगबग दिसून येत होती. मात्र उत्साह दिसत नव्हता. सातारा शहरातील फुटका तलाव गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे फुटक्या तळ्यामध्ये याही वर्षी तरंगत्या तराफ्यावर दाक्षिणात्य रूपातील गणेश मूर्ती विराजमान केली आहे.

आज सकाळीच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते गणेश मुर्ती ची स्थापना करण्यात आली. यादोगोपाळ पेठेतील राजमुद्रा गणेश मंडळाने आपली भव्य गणेश मूर्ती वर्षभर ज्या ठिकाणी ठेवली जाते त्याच मंडपात सजावट करून उत्सव सुरू केला आहे. पोवई नाका येथील सुप्रसिद्ध शिवाजी सर्कल गणेश मंडळ यांनी आपली पर्यावरण पूर्वक गणेश मूर्ती वर्षभर असते त्याच मंडपात स्थापन केली आहे .मोती चौकातील फेटा धारी गणेश मंडळाने तसेच केसरकर पेठेतील मयुर सोशल क्लब मंडळाने आपली भव्य गणेशमूर्तींची परंपरा खंडित करून अगदी छोट्या  मंडपात गणपती स्थापन केले आहेत.

फुटका तलाव गणेश मंडळाने दर वर्षीची आपली तरंगत्या तराफ्यावर फुटक्या तलावात बसविली जाणारी गणेश मूर्ती

दरवर्षी मानाचा समजला जाणारा महासम्राट गणपती यावर्षी मंडपात स्थापन करण्यात आलेला नाही. सर्व भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तसेच सदाशिव पेठेतील पंचमुखी मंडळाने  पंचमुखी गणेश मंदिरातच भाविकांना दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे. त्यात ही मंदिरे बंद असल्यामुळे सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले.

शेट्टी चौकातील प्रकाश मंडळाने दरवर्षी प्रमाणे मिरवणूक आणि  उपक्रम रद्द करून भरीव निधी हातावर पोट असणाऱ्या बँडवाले ,मजूर, कामगार यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभर अनेक मंडळांनी जमेल तसे छोटे मंडप उभारून गणेश मूर्तींची स्थापना केली .यावर्षी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी अजिबात गर्दी नसल्यामुळे अनेक गणेश मूर्ती विक्रेते चिंतेत पडले आहेत. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बसवा असा प्रशासनाने आदेश काढल्यामुळे अनेकांनी गणेश मुर्ती स्थापना न करण्याचा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील अगापूर या गावी दरवर्षी गणेशोत्सवा ऐवजी भद्रउत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी ही शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली असून या वर्षी हा उत्सव न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे .गणपती पुढे केवळ धार्मिक विधी करून उत्सव साजरा होणार आहे. दरवर्षी अनेक मानकरी तसेच बाहेरगावाहून येणारे गणेश भक्त या उत्सवासाठी येतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालतात त्यामुळे हा उत्सव रद्द केल्याने भाविकांनी दर्शनासाठी तसेच देवाला दाखवायचा नैवेद्य घेऊन येण्यासाठी बंदी असल्याचे अगापूर ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.

 पोवई नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ

यावर्षी गणेश मुर्ती बसवण्यासाठी मंडळांमध्ये निरुत्साह असल्यामुळे मागील वर्षी 476 मंडळांची नोंद झाली होती तर या वर्षी केवळ 353 मंडळांनी गणेशमूर्ती स्थापन करणार असल्याची परवानगी प्रशासनाकडून घेतली आहे. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने बंदोबस्तासाठी जिल्ह्यात 1370 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवत आहेत .यावर्षी. पालिकेच्या वतीने गणेश विसर्जन साठी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे पालिकेचा राजवाडा परिसरातील जलतरण तलाव बुधवार नाका सदर बाजार दगडी शाळा हुतात्मा स्मारक आदी ठिकाणी कृत्रिम तळी उभारण्यात आले आहेत यावर्षी जिल्ह्यात घरगुती व मंडळांच्या मिळून तब्बल 13 हजार मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावर्षी पुणे बेंगलोर महामार्ग नजीक असणाऱ्या परप्रांतीय कलाकारांनी मूर्ती बनवल्या नाहीत त्यामुळे हायवे नजीक मूर्ती घेण्यासाठी गर्दी झाली नव्हती .स्थानिक कारागिरांनी केलेल्या कमी उंचीच्या शाडूच्या मूर्ती अनेक मंडळांनी खरेदी केल्या तसेच घरात बसवण्यासाठी नागरिकांनी घेतल्या.

शहरातील मानाचा गणपती असलेला गुरुवार तालीम, शनिवार पेठेतल्या शिवपार्वती गणेश मंडळ, सोमवार पेठेतल्या आझाद मंडळ, जय जवान मंडळ या मंडळानी अतिशय साध्या पध्दतीने मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर दरवर्षीप्रमाणे मोठी मूर्ती दर्शनासाठी ठेवली आहे. गर्दी होऊ नये याकरता काळजी घेतली जात आहे. सकाळपासून शहरातील गणेशभक्तांची बाप्पांना नेण्यासाठी मूर्ती विक्रेत्याच्या स्टॉलवर सोशल डिस्टनन्स ठेवून गर्दी दिसत होते. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पुलाखाली मूर्तीकारांकडे ही भक्तांची गर्दी दिसत आहे.सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम व त्यांचे पती डॉ. संजोग कदम यांनी आज बाप्पांची प्रतिष्ठापना उत्साहात भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली. मूर्ती पर्यावरण पूरक अशी असून सर्व कुटूंब भक्तिभावाने या उत्साहाने सहभागी झाले आहेत.कोरोनाच्या सकंटामुळे येथील महागणपती सम्राट मंडळाने यावर्षी उत्सव स्थगित केला आहे. त्याऐवजी यावर्षी कोविड योध्द्यांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याची माहिती मंडळाचे संदेश तांबोळी, समीर खुटाळे, प्रकाश मांजरकर आणि अतुल टंकसाळे यांनी सांगितले.मोदकाची घरपोच सेवा..यावर्षी कोरोनामुळे अनेक बंधने आहेत. कोरोनाची काळजी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाचे नियमांची सक्ती आहे. गणेशोत्सव काळात गणपती बाप्पाचे नैवेद म्हणून मोदक घरपोच देण्याची सोय सातारा शहरात मिठाई विक्री करणाऱ्यानी नियम पाळून केल्याचे दिसत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!