ड्रग्ज प्रकरणात रिया कारागृहात:एनसीबीच्या कोठडीत रात्रभर झोपली नाही रिया, आता 14 दिवसांसाठी भायखळा कारागृहात रवानगी; पुन्हा जामिनासाठी अर्ज केला


 

स्थैर्य, मुंबई, दि९: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थांच्या संबधाचा तपास करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी रिया चक्रवर्तीला हिला अटक केली. अटकेनंतर तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आले. जिथे कोर्टाने तिला 14 दिवसांची कोठडी दिली आहे. मंगळवारची रात्र रियाने एनसीबीच्या कोठडीत काढली. त्यानंतर बुधवारी तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे.

नियमांनुसार, तुरूंगातील कैद्यांची गणना झाल्यानंतर उशीरा रात्री नवीन कैदी तुरुंगात घेतला जात नाही. त्यामुळे रात्रभर रियाला एनसीबीच्या कोठडीत ठेवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार लॉकअपमध्ये रियाला रात्रभर झोप आली नाही.

रिया आणि शोविक यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला

दरम्यान, रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. रियावर ड्रग्ज घेणे, सुशांतला ड्रग्ज देणे यासह अनेक गंभीर आरोप आहेत. रियाने एनसीबीच्या चौकशी ड्रग्जचे सेवन केल्याचे मान्य केले आहे.

मंगळवारी कोर्टात कोणता युक्तिवाद झाला?

मंगळवारी एनसीबीने कोर्टामध्ये रियाच्या जामिनाला विरोध दर्शवत युक्तीवाद केला. रिया चक्रवर्ती या प्रकरणातली आरोपी आहे. तिला जामीन मिळाला तर त्याचा परिणाम या प्रकरणावर होऊ शकतो. रियाने सुशांत सिंह प्रकरणात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर तपास करणे गरजेचे आहे असे एनसीबीने कोर्टात सांगितले. यावेळी रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी कोर्टात बाजू मांडली. रियाने चौकशीत सहकार्य केले आहे. याप्रकरणी एनसीबीने रिमांड मागितलेली नाही. एनसीबीने तिची चौकशी पूर्ण केली आहे त्यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे असे मानशिंदे यांनी म्हटले. मात्र कोर्टाने रियाचा जामीन फेटाळला.

28 ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने 10 दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अंमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

वकील सतीश मानशिंदे म्हणाले – न्यायाची थट्टा चालवली आहे

मंगळवारी रियाला अटक झाल्यानंतर तिच्या वकिलांनी खंत व्यक्त केली. “न्यायाची थट्टा चालवली आहे. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत, कारण ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या प्रेमात होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासले होते. जो मुंबईतील पाच अग्रगण्य मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होता. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचे सेवनातून आत्महत्या केली,” अशी खंत रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी व्यक्त केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!