
मिरगाव जिल्हा परिषद शाळेतील १० विद्यार्थी NMMS परीक्षेत पात्र ठरले असून दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २९ एप्रिल : फलटण तालुक्यातील मिरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल १० विद्यार्थी राष्ट्रीय NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. यापैकी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असून या यशाबद्दल ग्रामस्थांनी कौतुक व्यक्त केले आहे.
या परीक्षेत मनमित कमलाकर मोहिते आणि पायल लक्ष्मण पवार हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. त्यांना प्रत्येकी सुमारे ४८ हजार रुपये शासनाकडून मिळणार आहेत.
तसेच राजकन्या खताळ, पुर्वा फरांदे, धैर्यशील सरक, साक्षी सरक, स्वरा सरक आणि श्रुतिका खताळ यांसह इतर विद्यार्थीही पात्र ठरले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक दिगंबर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजनबद्ध तयारीमुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. यामध्ये सायली तुकाराम सरक, शिवांजली भोसले, अमोल सस्ते, दिलीप सरक, दादासो खताळ, गटविकास अधिकारी बोंबले, गटशिक्षणाधिकारी मठपती, केंद्रप्रमुख संजय धुमाळ, विस्ताराधिकारी अलका माने आणि मुख्याध्यापक संजय कचरे यांचा समावेश आहे.
या यशामुळे मिरगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटला आहे.
