
आषाढी एकादशीनिमित्त फलटण येथील आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरात लहान विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. बाल वारकऱ्यांच्या सहभागामुळे शालेय परिसर भक्तीमय झाला.
स्थैर्य, फलटण, दि. 17 जुलै : आषाढी एकादशीनिमित्त फलटण येथील आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरात लहान विद्यार्थ्यांची पालखी दिंडी काढण्यात आली. बाल वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात काढलेल्या या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह पालखीची मिरवणूक काढली. ज्ञानोबा-तुकाराम आणि पांडुरंग हरी असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी अभंग आणि भजने सादर केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भक्तीभाव, शिस्त, एकता आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेबद्दल आदर निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अनुराधा गोडसे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून त्यांना केळी वाटप केली.