इतर भाषांचा द्वेष नाही, पण मराठीशी तडजोड नाही: वाचा महाराष्ट्र दिन विशेष लेख!


सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१ मे १९६० रोजी ‘संयुक्त महाराष्ट्र’ अस्तित्वात आला. ज्या भाषेसाठी आणि राज्यासाठी हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या महाराष्ट्रात मराठी भाषेचे स्थान आणि महत्त्व यावर आजच्या दिवशी विचारमंथन होणे अत्यंत गरजेचे आहे.

महाराष्ट्रात मराठी बोलणे म्हणजे नेमके काय, इतर भाषांना विरोध करायचा का? या आणि अशा अनेक गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेणारा हा विशेष लेख:

प्रश्न १: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण भाषेवर का चर्चा करत आहोत?

उत्तर: महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही प्रामुख्याने भाषिक तत्त्वावर झाली आहे. मराठी बोलणाऱ्या लोकांचे एक राज्य असावे, यासाठी मोठा लढा उभारला गेला. त्यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या प्रगतीसोबतच आपल्या मातृभाषेच्या सद्यस्थितीचा आढावा घेणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

प्रश्न २: मराठी माणसाने महाराष्ट्रात मराठीतच बोलणे का गरजेचे आहे?

उत्तर: भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली संस्कृती आणि ओळख आहे. जेव्हा आपण आपल्या राज्यात आपली भाषा बोलणे सोडून देतो, तेव्हा ती भाषा सार्वजनिक जीवनातून हळूहळू नाहीशी होऊ लागते. महाराष्ट्रात राहून जर मराठी माणसानेच मराठीचा वापर केला नाही, तर बाहेरून आलेल्या लोकांना ती भाषा शिकण्याची किंवा वापरण्याची गरज कधीच वाटणार नाही.

प्रश्न ३: मराठीत बोलायचे म्हणजे हिंदी किंवा इंग्रजीत अजिबात बोलायचे नाही का?

उत्तर: अजिबात नाही! व्यावहारिक भान जपणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग ग्लोबल आहे. बहुतांश लोक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये किंवा आयटी (IT) क्षेत्रात काम करतात. तिथे कामकाज करताना, परराज्यातील सहकाऱ्यांशी बोलताना किंवा इंटरनॅशनल कॉल्स (International Calls) अटेंड करताना इंग्रजी किंवा हिंदीत बोलावेच लागेल. पोटापाण्याच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिक भाषा वापरणे ही काळाची गरज आहे, आणि त्यात कोणताही कमीपणा नाही.

प्रश्न ४: मग ‘महाराष्ट्रात मराठी’ हा आग्रह नेमका कुठे असायला हवा?

उत्तर: व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तर वगळता, आपला जो दैनंदिन व्यवहार आहे, तिथे मराठीचा आग्रह असणे मस्ट आहे. म्हणजेच:

  • प्रवास करताना: टॅक्सी, बस किंवा रिक्षाचालकांशी संवाद साधताना.

  • खरेदी करताना: दुकाने, मॉल्स किंवा भाजी मंडईत.

  • खाद्यसंस्कृती: नाक्यावरची चहाची टपरी असो वा एखादे मोठे हॉटेल/रेस्टॉरंट, ऑर्डर देताना. थोडक्यात सांगायचे तर, महाराष्ट्राच्या भूमीवर जो आपला रोजचा सार्वजनिक वावर आहे, तिथे संवादाची पहिली भाषा ‘मराठी’च असली पाहिजे.

प्रश्न ५: जर टॅक्सीचालक, दुकानदार किंवा हॉटेलचा वेटर आपल्याशी हिंदीत बोलू लागला, तर आपण काय करावे?

उत्तर: अनेकदा समोरचा हिंदीत बोलतोय म्हणून आपणही सवयीने लगेच हिंदीत बोलायला लागतो. ही सवय मोडली पाहिजे. समोरचा व्यक्ती हिंदीत बोलत असला, तरी आपण आपली वाक्ये मराठीतूनच सांगावीत. महाराष्ट्रात व्यवसाय करणारा कोणताही परप्रांतीय व्यक्ती काही महिन्यांतच मराठी समजायला लागतो, फक्त त्याला मराठीत उत्तर देण्याची सवय नसते. तुम्ही मराठीतून बोलत राहिल्यास, त्यांनाही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मराठीचा वापर करणे किंवा किमान ती समजून घेणे भाग पडेल.

प्रश्न ६: कस्टमर केअरशी (Customer Care) बोलताना मराठीचा पर्याय निवडणे का महत्त्वाचे आहे?

उत्तर: हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. जेव्हा आपण कोणत्याही कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करतो, तेव्हा IVR वर आवर्जून ‘मराठीसाठी… दाबा’ हा पर्याय निवडला पाहिजे.

  • याचे फायदे: कंपन्या त्यांच्या डेटाबेसमध्ये नोंदवतात की किती ग्राहक कोणत्या भाषेतून सेवा मागत आहेत. जेव्हा लाखो ग्राहक मराठीचा पर्याय निवडतील, तेव्हा कंपन्यांना नाईलाजाने मराठी भाषिक प्रतिनिधींची (Customer Care Executives) भरती करावी लागेल. याचा थेट फायदा महाराष्ट्रातील स्थानिक आणि मराठी तरुणांना रोजगार मिळण्यात होईल.

प्रश्न ७: आजच्या युवा पिढीला याबाबतीत काय संदेश देता येईल?

उत्तर: “कामापुरती इंग्रजी-हिंदी आणि व्यवहारात फक्त मराठी” हे सूत्र अंगीकारायला हवे. मराठी बोलण्यात कोणताही ‘डाऊनमार्केट’ पणा नाही, उलट आपल्या मातृभाषेत ठामपणे बोलणे हा आत्मविश्वास आहे. तुम्ही उत्तम इंग्रजी बोला, जगाच्या पाठीवर जाऊन यश मिळवा, पण महाराष्ट्रात जेव्हा टपरीवर चहा मागाल किंवा रिक्षावाल्याला पत्ता सांगाल, तेव्हा तुमच्या तोंडून अस्सल मराठीच बाहेर पडली पाहिजे.

तात्पर्य: इतर भाषांचा द्वेष न करता, आपल्या भाषेचा स्वाभिमान जपणे म्हणजेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा करणे होय! जय महाराष्ट्र!

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे (संपादक, “स्थैर्य”)


Back to top button
Don`t copy text!