नागपूरकरांचा ऑन द स्पॉट फैसला, दगडाने ठेचून गुंडाला संपवलं


स्थैर्य, नागपूर, दि.८: देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गल्ली-वस्त्यांमध्ये भाई-दादांच्या दादागिरीला नागपूरकर पुरते हैराण झाले आहे. पण, रविवारी लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि एका गुंडाचा जागेवरच फैसला करत दगडाने ठेचून मारल्याची घटना समोर आली आहे.

गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी एका गुंडाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना नागपूरच्या नारायण पेठेत घडली आहे. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम हाकेच्या अंतरावर होता. अजित पवारांचा कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांनी गुंडाचा जागेवरच फैसला केला.

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार ही थरारक घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शांतीनगरमधील नारायण पेठ येथे घडली. या घटनेने परिसरामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. विजय वाघमारे असे मृतक गुंडाचे नाव आहे. विजय वाघमारे हा गुंड आपल्या साथीदारांसह परिसरात हप्ता वसुली करायचा. लोकांना त्रास द्यायला. विजयवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. तो या परिसरात आपल्या साथीदार सोबत हप्ता वसुली करायचा. अशाच अनेक तक्रारी त्याच्या विरुद्ध तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.

रविवारी सुद्धा त्याने शांतीनगरमध्ये नागरिकांना त्रास देण्याचे काम केले. त्याच्या सततच्या त्रासाला वैतागलेल्या नागरिकांच्या संतापाच एकच कडेलोट झाला. नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत विजयवर हल्ला केला. लोकांचा संताप पाहून त्याचे पंटर लोकंही जागेवरून पळून गेले. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी दगडाने ठेचून विजयचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांच्या तावडीतून विजयची सुटका केली. तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजय वाघमारेचा मृत्यू झाल्यामुळे नारायण पेठच्या लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. पण, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता. त्यांच्या कार्यक्रमानंतर हा प्रकार घडला. शांतीनगर पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ही घटना अस बोलल्या जात आहे.


Back to top button
Don`t copy text!