हल्लाबोल : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्र फक्त मुंबई-पुण्याइतकाच मर्यादित आहे का ?’ – देवेंद्र फडणवीस


स्थैर्य, मुंबई, दि.८: राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. ‘मुख्यमंत्री मुंबई पाहतात आणि उपमुख्यमंत्री पुणे पाहतात, मग इतर ठिकाणी कोण बघणार? नागपूर, औरंगाबादमध्ये कोण पाहणार? मुंबई-पुण्या इतकंच तुमचं राज्य मर्यादित आहे का?’ असा सवाल फडणवीसांनी केला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘ज्याप्रकारे तुम्ही इतर अनेक विषय काढत आहात, त्यावरुन तुम्हाला कोरोनाविषयी असलेल्या मागण्यांवर बोलायचे नाही हे दिसत आहे. राज्यातील अनेक विषय आहेत, जे आठ दिवस संपणार नाहीत. महाराष्ट्र सर्वात नंबर एक आहे, मात्र कोरोनातही व्हावा, हे वाटले नव्हते. पाच राज्य मिळून 70 टक्के मृत्यू आहेत, मात्र त्यात 50 टक्के महाराष्ट्राचे आहेत. कमी टेस्ट करुन संख्या कमी दाखवण्याच‌ प्रयत्न होत आहे, मुंबईचा मृत्युदर किती आहे ते पाहा, कोरोना संसर्ग दर जास्त‌ दिसून येत आहे. पुण्यातल्या जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला, मात्र त्याची एन्ट्रीच केलेली नाही. सरकारचे संपूर्ण महाराष्ट्राकडे‌ लक्ष‌ नाही. तुमचे फक्त पुणे-मुंबईपुरते राज्य‌ मर्यादित आहे‌ का‌?’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सतत 20 टक्के संसर्ग दर असून, देश आणि अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. काल तर संसर्गाचा दर 25 टक्के होता. ही स्थिती भयावह आहे. जम्बो कोव्हिड सेंटर आहेत की, कुणाला तरी लाभ देण्यासाठी तयार केलेल्या फॅसिलिटी आहेत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला, हे वारंवार बाहेर आले आहे. बीकेसी कोव्हिड सेंटरचा विचार केला, तर कालच वर्तमानपत्रात बातमी आली, गेल्या महिन्यात तिथला मृत्युदर 37 टक्के होता. आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मृत्युमुखी पडत असेल, तर या कोव्हिड सेंटरमध्ये नेमके चालले काय आहे, कशासाठी ते सुरू केले? असा प्रश्न निर्माण होतो’, असेही फडणवीस म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!