मंत्र्यांनीसुद्धा घरुनच विठूरायाची पूजा करावी; अक्षयमहाराजांचा उपमुख्यमंत्र्यांना इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 


स्थैर्य, हिवडी (जि. सातारा), दि.२१ : अतिशय निष्ठेने परंपरा व नियम सांभाळणाऱ्या वारकऱ्यांना आदराने पंढरपूरात येऊ द्यावे, अन्यथा जसे वारकऱ्यांना घरी थांबण्यासाठी सांगत आहात, तसंच मंत्री महोदयांनीसुद्धा घरुनच विठूरायाची पूजा करावी, अशी स्पष्ट मागणी वारकरी संप्रदाय युवा मंचचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केली.

पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून २२ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती अद्याप कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, कार्तिक एकादशी दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्षयमहाराज बोलत होते.

अक्षयमहाराज म्हणाले, वारकरी संप्रदाय कायमच सरकारी यंत्रणेला सहकार्य करत आला आहे. मात्र, सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीये. शासनाने कार्तिक एकादशीसाठी प्रत्येक मठात किमान ३० ते ५० वारकऱ्यांना सर्व कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत परवानगी द्यावी. सध्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या बाबतीत राज्यभर प्रत्येक राजकीय पक्षांच्या बैठका सुरु आहेत. या बैठकांना शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात, तेव्हा शासन या बैठकांवर अंकुश कसा ठेवत नाही? त्यांना नियम का लागू होत नाहीत. वारी व आध्यात्मिक काही आले की लगेच नियम लागू होतात. असली दुटप्पी भावना सरकारने ठेऊ नये. वारकरी संप्रदाय कायम सहकार्य करत आला आहे अन पुढेही करेल.

संत गाडगेबाबा कधीच मंत्रालयाची पायरी चढले नव्हते. मंत्री महोदय त्यांच्या भेटीस मंत्रालयाबाहेर येऊन थांबत असायचे. एकेकाळी इतका आदर साधू संतांविषयी सरकार बाळगत होते. आता मात्र सर्वच राजकीय पक्ष किंवा मायबाप सरकार प्रत्येक अध्यात्मिक गोष्टींकडे कानाडोळा करत आहे. आज सरसकट मॉल व बाजार सुरु आहेत. तिथे कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता हजारो लोक वावरतात, तेव्हा शासन तिथे निर्बंध लावत नाही. शासनाची अशीच भूमिका कायम राहिली तर वारकरी संप्रदाय येत्या काळात आपली नाराजी दाखवून देईल यात शंका नाही. पोलिसांबाबत अत्यंत आदर बाळगत सांगू इच्छितो की, वारी बंदोबस्तासाठी १८०० पोलीस तैनात केले आहेत. त्याऐवजी जर किमान १५०० वारकरी येऊ दिले तर अडचण काय आहे? अन् वारकऱ्यांना घरी थांबवले जात असेल तर मंत्र्यांनी सुध्दा घरीच थांबावे व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विठूरायाची शासकीय पूजा करावी, असेही अक्षयमहाराजांनी शेवटी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!