![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/12/kavle_Manjar.jpg?resize=780%2C470&ssl=1)
स्थैर्य, कऱ्हाड, दि.२२: खवल्या मांजराची होणाऱ्या शिकारीसह त्याची तस्करी रोखण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात पुण्याचे वन्यजीवचे संरक्षक रमेश कुमार त्या अभ्यास गटाचे अध्यक्ष आहेत. सातारा जिल्ह्याच्या प्रादेशिकचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा हे सदस्य सचिव, तर कऱ्हाडचे पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे, चिपळूण येथील विश्वास काटदरे हे सदस्य आहेत.
राज्यातील विविध भागांत खवल्या मांजराची शिकार व त्यांच्या तस्करीत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार त्याचा कृती आराखडा करण्यास वन खात्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच खवल्या मांजरांचा यादृष्टीने अभ्यास होईल. खवले मांजराला इंग्रजीत “भारतीय पेंगोलिन’ असे म्हणतात. ही एक महत्त्वाची प्रजाती आहे. तिला वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत अनुसूची-1 मध्ये समाविष्ट केले आहे. राज्यात सर्वच वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खवले मांजर आहेत. मात्र, अंधश्रद्धेसह विविध कारणाने प्रजातीच्या अस्तित्वाला धोके निर्माण होत आहे. खवल्या मांजरीची शिकारीची एक मोठी समस्या आहे. त्या सगळ्याचा विचार करून अभ्यास गटाची स्थापना केली आहे.
खवल्या मांजराची खवल्यांची जास्त तस्करी होते आहे. त्यात संघटित गुन्हेगारी बोकळत आहे. त्याही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव मांडळाच्या बैठकीत खवल्या मांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे ठरले. त्यानुसार त्याचा अधिवास, त्याचे व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे, गुप्त माहिती मिळवणे, खवल्या मांजराबद्दल जागृती करणे आदींचे काम अभ्यास गटाद्वारे होणार आहे. त्याचा कृती आराखडा तयार होणार आहे. त्यानुसार अभ्यास गटाला संशोधनही करावे लागणार आहे.
असा आहे अभ्यास गट…
अध्यक्ष – रमेश कुमार (वनसंरक्षक, वन्यजीव, पुणे), सदस्य सचिव- डॉ. भारतसिंह हाडा (उप वनसंरक्षक, सातारा), सदस्य- दीपक खाडे (उपवनसंरक्षक, रत्नागिरी), रोहन भाटे (पर्यावरण अभ्यासक, कऱ्हाड), विश्वास काटदरे (पर्यावरण अभ्यासक, चिपळूण), डॉ. वरद गिरी (पर्यावरण अभ्यासक, पुणे), नितीन देसाई (पर्यावरण अभ्यासक, पुणे)