
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : मुंबई ते हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पावरून सध्या राजकीय संघर्ष चांगलाच तापला आहे. या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा थांबा बारामती येथे करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या प्रयत्नशील असतानाच, आता माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना थेट दिल्लीतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पूर्वनियोजनाप्रमाणे हा थांबा सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या फलटण तालुक्यातील शिंदेनगर येथेच व्हावा, यासाठी रणजितदादांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि याबाबत सविस्तर माहिती देणारे पत्र त्यांना सुपूर्द केले आहे.
रणजितदादांनी पत्रात मांडली ‘शिंदेनगर-शिंदेवाडी’ची भक्कम बाजू
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या पत्रात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या स्थानकाचे भौगोलिक आणि जनसुविधेच्या दृष्टीने असलेले महत्त्व पटवून दिले आहे. प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गावर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणारे शिंदेनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणारे शिंदेवाडी यांच्या मध्यभागी एका योग्य ठिकाणी बुलेट ट्रेनचे स्टेशन (थांबा) उभारण्यावर सकारात्मक विचार व्हावा, अशी आग्रही मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
या स्थानकाचे फायदे काय?
रणजितदादांनी आपल्या पत्रात या स्थानकामुळे होणारे व्यापक फायदे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत:
तिन्ही जिल्ह्यांना फायदा: या मध्यवर्ती ठिकाणी स्टेशन उभारल्यास सातारा, सोलापूर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यांतील लाखो नागरिकांना बुलेट ट्रेनच्या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ मिळेल.
बारामतीलाही सोयीचे: विशेष म्हणजे, हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्याच्या अत्यंत जवळ असल्याने, बारामती व परिसरातील नागरिकांसाठीही हे स्टेशन अत्यंत उपयोगी आणि सोयीस्कर सिद्ध होईल.
सर्व क्षेत्रांना गती: या भागातील कृषी, दुग्ध व्यवसाय, उद्योग, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या हजारो नागरिकांचा मुंबई, पुणे, सोलापूर आणि हैदराबाद या प्रमुख शहरांशी संपर्क अत्यंत वेगवान होईल.
गुंतवणुकीला चालना: या आधुनिक परिवहन व्यवस्थेमुळे या क्षेत्रातील औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीला मोठी गती मिळून नवीन गुंतवणुकीच्या शक्यता निर्माण होतील.
डीपीआरमध्ये समावेश करण्याची मागणी
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे विस्तृत सर्वेक्षण आणि डीपीआर (DPR) तयार करताना शिंदेनगर आणि शिंदेवाडीच्या दरम्यान स्टेशन उभारण्याच्या व्यवहार्यतेचा विशेष अभ्यास करावा आणि या महत्त्वपूर्ण मागणीचा प्रकल्पात समावेश करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती रणजितदादांनी केंद्रीय मंत्र्यांना केली आहे.
विद्यमान खासदारांचे मौन; फलटणकरांच्या आशा पुन्हा रणजितदादांवरच!
या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तब्बल ६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत पूर्णपणे मौन बाळगून आहेत. नेमकी हीच संधी साधून सुप्रिया सुळे हा प्रकल्प बारामतीकडे पळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पूर्वी नीरा-देवघरच्या हक्काच्या पाण्यावरूनही सुप्रिया सुळे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात असाच मोठा संघर्ष झाला होता, ज्यामध्ये रणजितदादांनी आपले राजकीय वजन वापरून फलटणला न्याय मिळवून दिला होता.
आता बुलेट ट्रेनच्या थांब्यावरूनही तोच संघर्ष पुन्हा उभा राहिला आहे. खासदार नसतानाही रणजितदादांनी दिल्लीत जाऊन थेट रेल्वेमंत्र्यांची भेट घेतल्याने त्यांचे राष्ट्रीय पातळीवरील वजन आणि फलटण तालुक्याविषयीची त्यांची आत्मीयता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. त्यांच्या या तत्पर आणि आक्रमक हालचालींमुळे हा प्रकल्प बारामतीकडे न जाता, फलटणकरांच्या हक्काच्या शिंदेनगर-शिंदेवाडीतच होईल, या आशा आता अधिक पल्लवित झाल्या आहेत.
