लक्ष्मण रेषा ओलांडू नका, अन्यथा…? भारताचा चीनला निर्णायक इशारा


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१०: नियंत्रण रेषेजवळील चीनच्या दादागिरीवर भारतीय सैन्याने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने लक्ष्मण रेषा ओलांडली तर, चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने ही माहिती दिली. उंचावरील या युद्धक्षेत्रामध्ये भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून आक्रमक पद्धतीने सैन्य तैनात केले जाते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही फॉरवर्ड पोझिशन्सवरील आपली स्थिती आणखी बळकट केली आहे. 

चुशूल सेक्टरमध्ये मुखपरी टॉपजवळ सोमवारी ४५ वर्षात पहिल्यांदाच गोळीबार झाला. त्यानंतर भारताकडून हा इशारा देण्यात आला. गुरुवारी मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीवरही बरेच काही अवलंबून आहे. 

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किना-याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. जो प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला व भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या दक्षिण किना-याजवळच्या टेकडया ताब्यात घेतल्या. तेव्हापासून चीनची दादागिरी आणि आक्रमकता वाढली आहे. 

भारतानेही आतापर्यंत चीनचा घुसखोरीचा एकही डाव यशस्वी होऊ दिलेला नाही. ‘चीनला युद्ध हवे असेल तर, त्यांना सुद्धा त्याची जबर किंमत चुकवावी लागेल, असे भारतीय अधिका-याने सांगितले. जशास तसं उत्तर म्हणून चीन याच क्षेत्रातील दुसरे अन्य उंचावरील भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु शकतो. पण भारताने सुद्धा ग्राऊंड लेव्हलवर तैनात असलेल्या आपल्या कमांडर्सना परिस्थितीनुसार प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आपले सैन्य उंचावरील क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह पूर्णपणे सज्ज आहे. चीनच्या रिजलाइनजवळ आपणही रणगाडे आणून ठेवले आहेत असे या अधिका-याने सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!