पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी दत्तात्रय शिंदे


स्थैर्य, पालघर, दि. 23 : गडचिंचले साधू हत्याकांडानंतर तात्कालिन पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना शक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर दत्तात्रय शिंदे हे सध्या कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई याठिकाणी कार्यरत असून त्यांची पालघरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शासन आदेशाद्वारे ही माहिती दिली असून कामाच्या ठिकाणावरून त्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. अद्याप कोणत्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहे याबाबत मात्र शासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत.तर दत्तात्रेय शिंदे यांनी या पूर्वी सिंधुदुर्ग सांगली आणि जळगाव येथे काम पाहिले आहे.

पालघर प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. जमावानं त्यांची कारही पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशबशी आपली सुटका करून घेतली. मात्र त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!